राजेश क्षीरसागरांनी महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये - रवि इंगवले
By समीर देशपांडे | Updated: September 16, 2022 14:31 IST2022-09-16T14:30:51+5:302022-09-16T14:31:45+5:30
'विनयभंग केल्याचे सिध्द केल्यास कोल्हापूरच काय देश सोडून जातो'

राजेश क्षीरसागरांनी महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये - रवि इंगवले
कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांनी मी गणपती मिरवणुकीत विनयभंग केल्याचे सिध्द केल्यास कोल्हापूरच काय देश सोडून जातो. परंतू त्यांनी पुरूषार्थ असेल तर स्वत तक्रार करायला हवी होती. महिलेच्या पदराआडून राजकारण करू नये असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख रवि इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
अनंत चतुर्दशीदिवशी शिंदे समर्थक असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या बूथसमोर इंगवले यांच्या फिरंगाई तालमीची मिरवणूक आली असता त्यांनी बूथवरील महिलांकडे पाहून अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्याप्रकरणी इंगवले यांनी आपली बाजू मांडली.
इंगवले म्हणाले, सुदैवाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्याच बूथवरून पूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण केले आहे. जर यात मी दोषी असेन तर देश सोडून जातो. परंतू खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत मातोश्री इंगवले यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.