वादळी पावसाने 'राजाराम'ची चिमणी जमीनदोस्त ; झाडे पडली, पॅव्हेलियनचे पत्रे निखळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:43 IST2020-04-18T19:40:42+5:302020-04-18T19:43:28+5:30
या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली.

कसबा बावड्यात आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे राजाराम कारखान्याची जुनी ४० फूट उंचीची चिमणी जमीनदोस्त झाली.
कसबा बावडा : वीजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज कसबा बावडा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे छत्रपती राजाराम साखर कारखान्याची ४० फूट उंचीची जुनी चिमणी जमीनदोस्त झाली. कारखाना गेली महिनाभर बंद असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. या वादळी पावसाने बावडा पॅव्हेलियनचे पत्रे निखळले. परिसरात आजही अनेक झाडे कोसळली. सव्वा पाच ते सव्वासहा असा सुमारे तासभर गारांसह वादळी पाऊस पडला. पावसामुळे काही काळा वीजपुरवठाही खंडित झाला.
सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. गारांसह पाऊस पडत असतानाच वादळही मोठ्या प्रमाणात सुटले. या वादळाच्या तडाख्यात राजाराम कारखान्याची चाळीस फूट उंचीची व अडीच फूट रुंदीची चिमणी कोसळली. चिमणी जुनी होती. चिमणी कोसळल्याने राजाराम कारखान्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कारखान्याच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली.
दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह परिसरात झालेल्या या वादळी पावसामुळे आजही अनेक ठिकाणांची झाडे कोसळली. हा पाऊस ऊस पिकाला पोषक असल्याने बळीराजा मात्र सुकावला. परिसरात पडलेल्या वळीव पावसामुळे खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीला आता गती येण्याची शक्यता आहे.