Kolhapur: तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत प्रवास होणार सुसाट, १० किलोमीटर उड्डाणपुलाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:22 IST2025-06-05T16:22:27+5:302025-06-05T16:22:46+5:30

तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग

Proposal to construct an elevated flyover of about 10 kilometers in Kolhapur from Tawde Hotel to Shivaji Bridge via Rankala Gaganbawada Road | Kolhapur: तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत प्रवास होणार सुसाट, १० किलोमीटर उड्डाणपुलाचा प्रस्ताव

Kolhapur: तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत प्रवास होणार सुसाट, १० किलोमीटर उड्डाणपुलाचा प्रस्ताव

सतीश पाटील

कोल्हापूर : तावडे हॉटेल ते शिवाजी पूल व्हाया रंकाळा गगनबावडा मार्ग असा सुमारे १० किलोमीटरचा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्याबाबत सध्या प्रस्ताव तयार करण्यात येत असून. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना नुकतीच चित्रफीत दाखविण्यात आली आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथून तावडे हॉटेलपर्यंत बास्केट ब्रिज होणार असून बास्केट ब्रिज संपल्यानंतर शिरोली जकात नाक्यापासून शिवाजी पूल आणि याठिकाणी रिंगरोड करून पुढे रंकाळा येथे गगनबावडा मार्गापर्यंत हा चारपदरी आणि दुपारी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. हा डीपीआर एल. एन. मालविया ही कंपनी तयार करत आहे.

तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा शहरातील प्रमुख वर्दळीचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी रोजची आहे. कोल्हापूर शहरात येण्यासाठी आणि शहरातून बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागत आहे. तावडे हॉटेल, कावळा नाका, दाभोळकर काॅर्नर, व्हीनस टाॅकीज, दसरा चौक, सीपीआर चौक, टाऊन हॉल, तोरस्कर चौक, त्याचबरोबर गगनबावडा मार्गावर गंगावेश, रंकाळा बसस्टँड, रंकाळा तलावापासून फुलेवाडीपर्यंत वाहतूक कोंडी कायमच आहे.

या मार्गावर रोज ४० ते ५० हजार वाहने धावतात, भविष्यात यामध्ये मोठी वाढ होणार असून आताच वाहतुकीच्या दृष्टीने उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. अशी दूरदृष्टी ठेवून आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन हा तावडे हॉटेलपासून शिवाजी पूल व्हाया रंकाळा गगनबावडा मार्गापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी मागणी लावून धरली आहे. यासाठी जानेवारीपासून जून २०२५ तीन-चार बैठका झाल्या आहेत.

महामार्गावरुन तावडे हॉटेलपासून शहरात प्रवेश केल्यानंतर मार्केट यार्ड- कावळा नाका- मध्यवर्ती बसस्थानक- दसरा चौक, सीपीआर चौक मार्गाने जाणाऱ्या या उड्डाणपुलाला सीपीआर चौकात वळवण्यात येणार आहे. करवीर पंचायत समितीला आणि सध्याचा चालू रस्ता यांच्यामधून स्मशानभूमीच्या बाजूने शिवाजी पुलाकडे रत्नागिरी राज्यमार्गाला तसेच पंचगंगा नदीघाटाच्या बाजूने लक्षतीर्थ वसाहतीमार्गे गगनबावडा राज्य मार्गाला हा उड्डाणपूल जोडण्यात येणार आहे.

गरज काय..?

कोल्हापूरही शहर म्हणजे हौसेला मोल नसणारे शहर आहे. जगातील जवळपास सर्वच प्रकारच्या अलिशान गाड्या शहरात धावतात. दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली, आणि भविष्यात ही वाढणारच आहे. त्यामुळे याठिकाणी नवे किंवा पर्यायी रस्ते तयार होणे गरजेचे आहे. कारण सध्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. शहराच्या कोणत्याही मार्गावर जा, तिथे वाहतूक कोंडी ठरलेली आहे, त्यातच रत्नागिरी आणि गगनबावडा, सिंधुदुर्ग या कोकणात जाण्यासाठी तावडे हॉटेल शिवाजी पूल हा मुख्य मार्ग आहे.

महापालिका करणार भूसंपादन..

या मार्गावर उड्डाणपूल करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने भूसंपादन तसेच उपयुक्त प्रणाली शिफ्टिंग करून द्यावे अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. उड्डाण पुलाचा प्रस्ताव खासगी कन्सल्टिंग कंपनी करत असून तो तयार झाला की या प्रकल्पाला एकूण किती खर्च येईल हे समजणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग मुख्य कार्यालय दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे.

परिख पुलाचे भाग्य उजाडणार..

याच मार्गावर शेजारी परिख पूल आहे. याठिकाणी मोठी वाहनांची गर्दी असते. हा चौक सुद्धा या मार्गाला जोडावा यासाठी खासदार शाहू छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार बदल करण्याचे काम सुरू आहे.

दृष्टिक्षेपात उड्डाणपूल..

  • तावडे हॉटेल ते शिवाजी पूल व्हाया रंकाळा गगनबावडा मार्ग
  • रस्त्याची लांबी सुमारे १० किलोमीटर
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकणाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग
  • तावडे हॉटेल ते शिवाजी पूल मार्गावर केएमटी बसचे जाता येता २८ थांबे. याच मार्गावर ७ मोठे सिग्नल, ९ रिक्षा थांबे आहेत.
  • रोज सुमारे ४० ते ५० हजार वाहनांची ये-जा


५० हजार वाहने रोज तावडे हॉटेलपासून शिवाजी पूल आणि पुढे रंकाळा गगनबावडामार्गापर्यंत उड्डाणपूल उभारला तर शहरातील लोकांची आणि शहरात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय होईल.

उड्डाणपुलात दाभोळकर कॉर्नर ते पाच बंगला शाहूपुरी अशा मार्गावर बाबुभाई परिख पुलाला पर्यायी ठरणाऱ्या उड्डाणपुलाचेही काम धरण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. याशिवाय शिवाजी पूल ते केर्ले गावापर्यंत उड्डाणपूल बांधावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा मंत्री गडकरी नक्कीच विचार करतील. - खासदार शाहू छत्रपती
 

कोल्हापूर शहरात वाढलेली वाहने, वाहतूक कोंडी, कोल्हापूरमधून कोकणात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग म्हणून तावडे हॉटेलपासून शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. यासाठी हा प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवून, तसेच राज्य शासनाकडून युटिलिटी सिस्टमसाठी निधी मंजूर करून आणणार आहोत. - आमदार अमल महाडिक

तावडे हॉटेलपासून शिवाजी पूल आणि पुढे रंकाळा गगनबावडामार्गापर्यंत उड्डाणपूल उभारला तर शहरातील लोकांची आणि शहरात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय होईल. - आमदार राजेश क्षीरसागर

तावडे हॉटेलपासून शिवाजी पूल ते रंकाळापर्यंत उड्डाणपूल करताना हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग डिस्क्लेर केला पाहिजे. त्यामुळे रस्त्यात येणाऱ्या व्याबसायिकांना त्रास होणार नाही. पुणे-बंगळुरू ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण महामार्ग जोडला पाहिजे. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने स्पेशल केस म्हणून निधी द्यावा. - आमदार सतेज पाटील

Web Title: Proposal to construct an elevated flyover of about 10 kilometers in Kolhapur from Tawde Hotel to Shivaji Bridge via Rankala Gaganbawada Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.