अदानींच्या प्रकल्पासाठी पाटगावमधील एक थेंबही देणार नाही, पालकमंत्री मुश्रीफ यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 13:48 IST2023-12-26T13:47:31+5:302023-12-26T13:48:16+5:30
मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

अदानींच्या प्रकल्पासाठी पाटगावमधील एक थेंबही देणार नाही, पालकमंत्री मुश्रीफ यांची भूमिका
कदमवाडी : पाटगाव धरणासंबधी शिष्टमंडळ येऊन भेटत आहे. बाष्पीभवन होणारे पाणी प्रकल्पासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती असून पाटगावचे पाणी कमी होणार नाही याची दक्षता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला घ्यावी लागेल. यासाठी खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा नेमका काय प्रकल्प आहे आणि यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एक थेंबही पाणी जाणार नाही, अशी भूमिका घेऊ असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाटगाव धरणातील पाण्यावर आधारित अदानी समूहातर्फे प्रकल्प त्या परिसरातील जंगलात होत असून त्याचे काही प्रमाणात कामही सुरू झाले आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून सध्या हा प्रकल्प कोकणात सुरू असल्याचे समजते. ते जर का धरणातील पाण्याला धक्का न लावता खाली काय करत असतील तर माहीत नाही, पण पाटगाव धरणातील पाणी जाऊ नये याची खबरदारी घ्यावी लागेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्याने एकावर्षी दोनवेळा पीक कर्ज घेतले आहे, ही तांत्रिक बाब पुढे आली आहे. पात्र-अपात्र ठरलेल्या सर्वांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मोदी यांना कोणही रोखू शकत नाही..
मंत्री मुश्रीफ म्हणाले, सध्या सी व्होटर आणि जनमत चाचण्या काही जरी आल्या तरी येणाऱ्या २०२४ ला मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. कारण सध्याचे मध्य प्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड येथील एक्झिट पोल आपण बघितले आहेत. कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा या शिंदे गटाच्या असून आम्ही राष्ट्रवादी म्हणून कोणत्याही जागेवर दावा सांगितलेला नाही.