Kolhapur: विरोधकांनी ‘ईव्हीएम’ला दोष देण्यापेक्षा वस्तूस्थिती स्वीकारावी - मंत्री आबिटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:31 IST2025-12-22T13:30:03+5:302025-12-22T13:31:24+5:30
महापालिका निवडणुकीतही महायुतीचे वर्चस्व राहील

Kolhapur: विरोधकांनी ‘ईव्हीएम’ला दोष देण्यापेक्षा वस्तूस्थिती स्वीकारावी - मंत्री आबिटकर
कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ पैकी ११ नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये महायुतीने यश मिळवले आहे. यातून सामान्य माणसाचा विश्वास महायुतीवर असल्याचे पुन्हा अधोरिखित झाले असून, आता विरोधकांनी ‘ईव्हीएम’ला दोष देण्यापेक्षा वस्तूस्थिती स्वीकारून पुढे जाण्याची गरज असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून केलेल्या कामावर जनता खुश असल्याचे या निकालावरून स्पष्ट होते. ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची असल्याने काही ठिकाणी महायुती एकमेकांविरोधात लढली, हे जरी खरे असले तरी मूरगूडमध्ये संजय मंडलिक यांचे तर कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांचे प्राबल्य आहे. स्थानिक संदर्भामुळे प्रत्येकाचा छुपा अजेंडा असतो.
कोल्हापूर महापालिकेसाठी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. पाच वर्षे निवडणूक नसल्याने प्रत्येकाला संधी हवी आहे. पण, सगळ्यांना सोबत घेऊन मेरिटवर उमेदवारी दिली जाणार आहे. नगरपालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, याच बळावर आगामी महापालिकेसह जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळेल, याबाबत माझ्या मनात काही शंका नसल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते.