आक्रोश पदयात्रा: कृत्रीम श्वासावर; तरीही आईचे राजू शेट्टींना लढण्यासाठी बळ

By राजाराम लोंढे | Updated: October 21, 2023 18:35 IST2023-10-21T18:13:53+5:302023-10-21T18:35:08+5:30

व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे आईची भेट

Mother gave Raju Shetty the strength to fight even when he was on artificial respiration | आक्रोश पदयात्रा: कृत्रीम श्वासावर; तरीही आईचे राजू शेट्टींना लढण्यासाठी बळ

आक्रोश पदयात्रा: कृत्रीम श्वासावर; तरीही आईचे राजू शेट्टींना लढण्यासाठी बळ

कोल्हापूर : आई रत्नाबाई कृत्रीम श्वासावर असल्याने पदयात्रा काढायची की नाही? या विवंचनेत राजू शेट्टी होते. पण ‘तू पदयात्रा सुरु कर, मला काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊनच घरी परत ये. असे शब्द रुपी बळ दिल्यानंतर शेट्टी यांनी पदयात्रेला सुरुवात केली आहे.

मागील हंगामातील ऊसाला प्रतिटन चारशे रुपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी १७ ऑक्टोबरपासून आक्रोश पदयात्रा सुरु केली आहे. शेट्टी यांच्या आजपर्यंतच्या लढाई त्यांच्या आईंनी माेठे पाठबळ दिले आहे. कोणत्याही आंदोलनाची सुरुवात आईला नतमस्तक करुनच सुरु करतात. २२ दिवसांची पदयात्रा ही मोठी लढाई होती, पण आई रत्नाबाई यांचे वय ९८, वार्धक्यामुळे तीन महिन्यापासून अंथरुणाला खिळून पडल्या आहेत. त्यांच्यावर घरीच वैद्यकीय उपचार सुरु असून त्या कृत्रीम श्वासोश्वासावर आहेत. पदयात्रा सुरु करायची की नाही? या व्दिधा मनस्थिती शेट्टी होते.

तरीही, पदयात्रेला निघण्यापुर्वी आईचे चरणस्पर्श करण्यासाठी गेले आणि ते भावनिक झाले. मुलग्याच्या चेहऱ्यावरील घालमेल पाहून रत्नाबाई म्हणाल्या, मला काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना न्याय देऊनच घरी परत ये. असे शब्द रुपी बळ दिल्यानंतर शेट्टींना मोठ्या लढाईसाठी दहा हत्तीचे बळ मिळाले.

व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे आईची भेट

राजू शेट्टी यांची पदयात्रेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसभर उन्हातान्हात चालत असताना मनात आईची काळजी शेट्टींना आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे ते आईशी संपर्क साधत असून तब्बतेची विचारपूस करत आहेत.

३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर पदयात्रा

उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये मिळावा आणि राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेस शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून प्रारंभ झाला आहे. ही पदयात्रा ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किलोमीटर अशी आहे. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.
 

Web Title: Mother gave Raju Shetty the strength to fight even when he was on artificial respiration