मंत्री अशोक चव्हाण म्हणजे कोतवाल बनलेले राजकारणी : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:14 IST2021-05-15T17:10:32+5:302021-05-15T17:14:13+5:30
कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदावरुन कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी ...

मंत्री अशोक चव्हाण म्हणजे कोतवाल बनलेले राजकारणी : सदाभाऊ खोत
कोल्हापूर: सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदावरुन कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी टिका आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. चव्हाण यांना कसलेही स्वातंत्र्य नाही, ते आता पोपटासारखे बोलत आहेत, पण त्यांचा पिंजऱ्यातील पोपट झाला आहे, अशीही टिप्पणी केली.
आरक्षण मर्यादेवरुन मंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी हातपाय बांधून तलवार हाती दिली तर लढणार कसे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी चव्हाण यांच्यावर टिकेचे बाण सोडताना त्यांना मराठा आरक्षण उपसमितीवरुन हटवावे अशीही मागणी केली. चव्हाण यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपद भूषवलेला पुन्हा कमी दर्जाच्या खाते सांभाळताना दिसत आहे.
हे म्हणजे तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखे आहेत. त्यांची वक्तवे पाहता यांच्यावर आता वेड्याच्या रुग्णालयात जायची वेळ आली आहे. तुम्ही फार हुशार आहात, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, दोन वर्ष काय अफूच्या गोळ्या घेऊन काम करत होता का अशी टिप्पणीही केली.
खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण करंट्या महाविकास सरकारने रद्द केले. राज्य सरकारने कोर्टात योग्य रित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांनाही सोबत घेतले नाही. वकीलांना मार्गदर्शन केले नाहीत. गायकवाड समितीतील महत्वाचे पुरावे जोडले नाहीत. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले, पण राज्य सरकार का गेले नाही. यावरुन सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट होते.