महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन, सीमाभागावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:58 IST2026-03-18T12:57:37+5:302026-03-18T12:58:16+5:30
अन्यायाविरुद्ध लढणारा निष्कलंक लोकनेता पडद्याआड

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन, सीमाभागावर शोककळा
बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसाच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे बुलंद नेतृत्व, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक अर्जुनराव दळवी (वय ८४) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सीमालढ्यातील एका ध्येयनिष्ठ पर्वाचा अंत झाला.
दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नावर केवळ राजकीय नव्हे, तर कायदेशीर आणि वैचारिक पातळीवरही मांडणी केली होती. समितीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक कठीण प्रसंगी कार्यकर्त्यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या निधनामुळे सीमाभागातील मराठी चळवळ पोरकी झाली असून, महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला मुख्य आधारस्तंभ गमावला आहे.
तब्बल ६ दशकांहून अधिक काळ सीमालढ्यात सक्रिय राहिलेल्या दळवींनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. प्रशासकीय दडपशाही असो वा राजकीय पेच, त्यांनी कधीही मराठी अस्मितेशी तडजोड केली नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली.