सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:01 IST2022-12-16T18:40:25+5:302022-12-16T19:01:06+5:30
महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू केला.

सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार, मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
निंगाप्पा बोकडे
चंदगड : सीमाभागातील अडीअडचणी समजून घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी असल्याचे मत राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बाळासाहेबांची शिवसेना प्रणित शिवशाही युवा आघाडीच्या प्रचारसभेत आज, शुक्रवारी ते बोलत होते.
मंत्री देसाई म्हणाले, चंदगडच्या समस्यांची मला जाण असून चंदगडचे मागासलेपण पुसण्यासाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देऊ, असे आश्वासन देऊन तालुक्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच शिंदे-फडवणीस सरकारने नेहमीच सीमाभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू करून सीमाभागातील मराठी भाषिकांना दिलासा दिला आहे.
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत यापुढील काळात दोन्ही राज्यांनी सामंजस्यांची भूमिका घ्यावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे आम्ही यापुढील काळात ती काळजी घेऊन मराठी भाषिकांच्या पाठीशी राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.