Maharashtra Bandh : कोल्हापूर : अनियंत्रित गर्दीला कौशल्याने हाताळले, हुशारीने आखली नीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 18:48 IST2018-08-09T18:43:15+5:302018-08-09T18:48:29+5:30
मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ यशस्वी झाल्यानंतर घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते , अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फूर्तीदायक गाणी लावली.

Maharashtra Bandh : कोल्हापूर : अनियंत्रित गर्दीला कौशल्याने हाताळले, हुशारीने आखली नीती
कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ यशस्वी झाल्यानंतर घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते , अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फूर्तीदायक गाणी लावली.
गुरुवारचा ‘कोल्हापूर बंद’ यशस्वी करण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले होते. त्यानुसार अनेकांनी बंद आणि दसरा चौकात होणाऱ्या सभेस उपस्थित राहण्याची तयारी केली होती. सकाळी नऊ वाजल्यापासून समाजाचे जथ्ये दसरा चौकाकडे जात होते.
सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी तुडुंब गर्दी झाली होती. त्यामुळे जमावाच्या झुंडीच्या झुंडी शहराच्या विविध भागांत रॅली काढण्यात मश्गूल झाल्या.
गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नव्हते आणि जमाव कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यामुळे सभेतील भाषणे झाल्यानंतर जमावाला शांतपणे घरी घालविणे एक आव्हान होते.
घरी परत जाताना जमावाकडून काही अप्रिय घटना घडेल का, याची चिंता प्रमुख समन्वयकांना लागली होती. अखेर सभेचे कामकाज संपले. तेव्हा मोठ्या हुशारीने समन्वयकांनी स्टेजजवळ लावण्यात आलेल्या स्टेरिओवर स्फूर्तीदायक गाणी लावली.
‘जय भवानी, जय शिवाजी, मर्द मराठा’ अशा गाण्यांच्या तालावर उपस्थित जमाव नृत्य करायला लागला. ज्यांना नृत्य करायचे होते ते दसरा चौकात थांबून राहिले. ज्यांना त्यात रस नव्हता त्यांनी माघारी फिरणे पसंत केले. ही नीती आखल्यामुळे जमाव एकाच वेळी दसरा चौकातून न जाता तो हळूहळू निघून गेला. शांततेत माघारी फिरला.
छत्तीस तासांहून अधिक काळ ‘कोल्हापूर बंद’
कोल्हापूर शहर व परिसराने यापूर्वी अनेक वेळा विविध कारणांनी ‘कोल्हापूर बंद’ पाहिला. बंदमध्ये सहभाग घेतला; परंतु गुरुवारसारखा बंद बऱ्याच वर्षांनी पाहिला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोल्हापुरातील इतर ‘बंद’च्या काळात सर्वसाधारणपणे दुपारी चार वाजेपर्यंत व्यवहार बंद राहायचे आणि त्यानंतर व्यवहार सुरळीत व्हायचे.
मराठा आरक्षणाबाबत ‘बंद’ जाहीर झाल्यानंतर बुधवारी रात्रीपासूनच सर्व व्यवहार बंद झाले. गुरुवारी दिवसभरात कोणीही दुकानांची शटर्स उघडली नाहीत. शुक्रवारी सकाळी नऊनंतरच दुकाने उघडली जातील. त्यामुळे ३६ तासांचा हा ‘बंद’ पाळला गेला. १९९३ मध्ये अंबाबाई मंदिरात सुतळी बाँम्ब फुटल्यानंतर कोल्हापुरात सलग तीन दिवस शहरात कर्फ्यू लागला होता. त्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी एवढा मोठा ‘बंद’ पाहायला मिळाला.