कोल्हापूर: जिल्ह्यात मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे आज, सोमवारी सकाळी करूळ घाटात दरड कोसळली. मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन तासांपासून घाटातील वाहतूक खोळंबली आहे. सध्या महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.धरणक्षेत्रातही जोरदार बरसला, ‘राधानगरी’तून विसर्ग वाढवलाजिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पावसाने रिपरिप सुरू केली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस असल्याने पाटबंधारे विभागाने राधानगरी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या प्रति सेंकद २५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘भोगावती’, ‘पंचगंगा’ काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सात बंधारे पाण्याखालीदरम्यान, चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १६.४ मिलिमीटर पाऊस झाला. शाहूवाडी, गगनबावडा, गडहिंग्लज, आजरा, कागल, भुदरगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी, दूधगंगा, कासारी, घटप्रभा, तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे ‘भोगावती’ व पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. सद्या जिल्ह्यात सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.आजपासून यलो अलर्टआज, सोमवारपासून दोन दिवस जिल्ह्यासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पाण्याखालील बंधारे - ०७
- रुई - ४३ फूट १० इंच (इशारा ६७ फूट, धोका ७० फूट)
- इचलकरंजी - ३५ फूट ९ इंच (इशारा ६८ फूट, धोका ७१ फूट)
- तेरवाड - ३३ फूट ०५ इंच (इशारा ७१ फूट, धोका ७३ फूट)
- शिरोळ - २८ फूट ०८ इंच (इशारा ७४ फूट, धोका ७८ फूट)
- नृसिंहवाडी - २४ फूट ०२ इंच (इशारा ६५ फूट, धोका ६८ फूट)