कोल्हापूर : नवरंग, दो आँखे बारा हात अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक त्यागराज बाबुराव पेंढारकर (वय ९३) यांचे शुक्रवारी कोल्हापुरातील फ्रेंडस कॉलनी येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रकर्मी भालजी पेंढारकर व व्ही. शांताराम यांचे ते पुतणे होत.
त्यागराज पेंढारकर यांनी वयोमानामुळे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमधून निवृत्ती घेतली होती. शुक्रवारी अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाला अखेर सकाळी साडे नऊ वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा महेश, मुलगी तेजस्विनी, सुन अनघा पेंढारकर असा परिवार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रकर्मी पुरस्काराने गौरवले होते. तसेच दिनकर द पाटील, एशियन फिल्म फेस्टिवल या पुरस्कारांसह त्यांना व्ही. शांताराम जन्मशताब्दी समारोह समितीच्यावतीने गौरवण्यात आले होते. पडद्यामागचा माणूस हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे चिरंजीव असलेल्या त्यागराज पेंढारकर यांनी १९४८ मध्ये भालजी पेंढारकर यांच्याकडे दिग्दर्शन विभागात कामाला सुरवात केली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या राजकमल कला मंदीरमध्ये प्रथम दिग्दर्शन विभागात व नंतर छायालेखक विभागात काम करु लागले. छायालेखक व मामा जी. बाळकृष्ण यांचा सहाय्यक छायालेखक म्हणूनही काम करत होते. त्यांनी सुरंग, तीन बत्ती चार रस्ता, परछाई, अमर भूपाळी, सुबह का तारा, झनक झनक पायल बाजे या चित्रपटांसाठी छायालेखन केले.
तर मौसी या चित्रपटापासून त्यांनी स्वतंत्र छायालेखनाला सुरवात केली. राजकमलच्या नवरंग, स्त्री यासह दिवाना, बागी, पैसा या प्यार, मेरे सरताज, जेमिनीच्या समाज को बदल डाला, या हिंदी तसेच गुजराती, पंजाबी, कोकणी, चित्रपटांचेही छायालेखन केले. यशोदा आंधळा मारतो डोळा, राजा शिवछत्रपती, चव्हाटा, बालशिवाजी, स्त्री जन्मा तुझी कहाणी, पूर्ण सत्य, आघात, शपथ तुला बाळाची, महिमा जोतिबाचा, अभिलाषाा अशा अनेक मराठी चित्रपटांचे त्यांनी छायालेखन केले.