संरक्षण क्षेत्राच्या उद्योगात कोल्हापूरला अनेक संधी: डॉ. जी. सतीश रेड्डी; शिवाजी विद्यापीठाचा ६२वा दीक्षान्त समारंभ उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:51 IST2025-12-25T11:50:20+5:302025-12-25T11:51:21+5:30
संशोधन व पीएच.डी.त भारत तिसऱ्या स्थानी

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : कोल्हापुरात उद्योगांची संख्या मोठी आहे. येणाऱ्या काळात संरक्षण क्षेत्राशी निगडित साहित्य बनविण्याच्या उद्योगात कोल्हापूरला अनेक संधी आहेत. त्यांनी ‘डीआरडीओ’ व सैन्यदलाशी संपर्क साधल्यास उद्योगांना नक्कीच मोठा फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी बुधवारी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचा ६२वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात बुधवारी सकाळी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रेड्डी बोलत होते. समारंभात राज्यशास्त्र अधिविभागाचा विद्यार्थी अक्षय नलवडे-जहागीरदार याला राष्ट्रपती सुवर्णपदक आणि मानसशास्त्र अधिविभागाची विद्यार्थिनी आर्या देसाई हिला कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आहे. त्याशिवाय, १६ विद्यार्थ्यांना पारितोषिके व ४१ जणांना पीएच. डी. पदव्या देण्यात आल्या.
डॉ. रेड्डी म्हणाले, शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे ही नावीन्यपूर्व उपक्रम, संशोधन, तंत्रज्ञान विकासाची इंजिने आहेत. विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत असताना जे काही करतो, त्यात उत्कृष्टतेचा ध्यास घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भरीव योगदान द्यावे. यात शिवाजी विद्यापीठदेखील महत्त्वाची भूमिका बजावेल.
भारतासारख्या विकसनशील देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एक हजाराहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे चार कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही लोकसंख्या एका छोट्या राष्ट्राहून कमी नाही.
प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, दीक्षान्त समारंभात पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी नवीन झेप घेण्यासाठी तयार असतात. मिळालेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी समाज, राज्य व देशाच्या प्रगतीसाठी उपयोग केला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, डेटा सायन्समध्ये संशोधनाच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी नवसंकल्पनांच्या माध्यमातून मानवी मूल्ये जपावीत.
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर केला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रांची माहिती सादर केली. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.
संशोधन व पीएच.डी.त भारत तिसऱ्या स्थानी
भारत संशोधन व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आहे. १० वर्षांपूर्वी देशातील काही संस्था जागतिक क्रमवारीत होत्या, त्यांची संख्या आज वाढली आहे. पुढील काही वर्षांत जगातील टॉप १०० शैक्षणिक संस्थांमध्ये भारत अव्वल राहील. त्यामुळेच परदेशी विद्यापीठांनी भारतात शैक्षणिक संस्था सुरू करण्यास सुरुवात केली आहे, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.