आखाती युद्धाचा कोल्हापूरला फटका; फाऊंड्रीची दहा हजार कोटींची उलाढाल होणार ठप्प, २५ हजार कामगार संकटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:03 IST2026-03-14T12:03:34+5:302026-03-14T12:03:59+5:30
केमिकलचे दर अव्वाच्या सव्वा

आखाती युद्धाचा कोल्हापूरला फटका; फाऊंड्रीची दहा हजार कोटींची उलाढाल होणार ठप्प, २५ हजार कामगार संकटात
कोल्हापूर : देशभर प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या फाऊंड्री उद्योगाला इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ बसली असून तब्बल दहा हजार कोटींची उलाढाल यामुळे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. या उद्याेगात सर्वच ठिकाणी एलपीजी गॅस लागतो. मात्र, गॅसचा प्रचंड तुटवडा असल्याने हा उद्योग कधीही बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ४०० च्या आसपास लहान-मोठे फाऊंड्री उद्योग आहेत. येथील फाऊंड्री देशभर प्रसिद्ध असून जगभरातल्या अनेक देशांमध्ये दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची निर्यात फाऊंड्री उद्योगातून केली जाते. २५ हजार कामगार या उद्योगावर अवलंबून असून जवळपास दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल या उद्योगातून प्रत्येक वर्षी होते. मात्र, मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद कोल्हापूरच्या फाऊंड्री उद्योगावर झाले आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढालीसह रोजीरोटीवरही गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रत्येक प्रक्रियेत लागतो गॅस
फाऊंड्री उद्योगात सँडचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तिच्या प्रत्येक प्रक्रियेत गॅस लागतोच. मात्र, सध्या गॅसचा तुडवडा असल्याने फाऊंड्रीमधील ही प्रक्रियाच ठप्प होण्यास सुरुवात झाली आहे.
एका कंटेनरसाठी चार-चार लाख वसूल
कोल्हापुरातून फाऊंड्री उद्योगातून निर्यात केली जाते. शिवाय, इतर देशांमधून या उद्योगासाठी कच्चा मालही आयात केला जाते. मात्र, बंदरामध्ये एका एका कंटेनरसाठी चार-चार लाख रुपये युद्ध टॅक्सच्या नावाखाली वसूल केले जात असल्याने निर्यात व आयात दोन्हींवरही परिणाम झाला आहे.
केमिकलचे दर अव्वाच्या सव्वा
फाऊंड्रीत सध्या गॅसचा तुटवडाच आहे. मात्र, वाहतूक खर्चही दुप्पट झाल्याने हा व्यवसाय सुरू ठेवायचा की नाही, या मानसिकतेत उद्योजक आहेत. फाऊंड्रीसाठी लागणाऱ्या केमिकलच्या दरात तिप्पट-चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे इतक्या चढ्या दराने केमिकल घेऊन हा व्यवसाय सुरू ठेवणे उद्योजकांना शक्य नसल्याने अनेकांनी या काळात फाऊंड्री व्यवसाय बंद ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
गॅसचा तुटवडा, वाढलेला वाहतूक खर्च, केमिकलचे चढे दर यामुळे फाऊंड्री उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. फाऊंड्री उद्योगासाठी एलपीजी गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. -राहुल पाटील, चेअरमन, कोल्हापूर फाऊंड्री असोसिएशन.