सर्वसंमतीशिवाय कोल्हापूरची हद्दवाढ अशक्य, खासदार शाहू छत्रपतींनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:38 IST2025-06-05T16:37:55+5:302025-06-05T16:38:30+5:30
मग कागलपर्यंतची गावे घ्याच, विरोधातील १८ गावच्या सरपंचांनी घेतली भेट

सर्वसंमतीशिवाय कोल्हापूरची हद्दवाढ अशक्य, खासदार शाहू छत्रपतींनी केले स्पष्ट
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि सर्वसंमतीशिवाय होणार नाही, हे स्पष्टच आहे. दोन्ही बाजूंशी समन्वय घडविण्याचे काम सध्या सुरू आहे. दोन्ही बाजूंशी चर्चा झाल्यानंतर एकमतानेच हद्दवाढीचा निर्णय होईल; अन्यथा होणार नाही, असे खासदार शाहू छत्रपती यांनी बुधवारी स्पष्ट केले. परवाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना भेटण्यावर लोकप्रतिनिधींचे एकमत झाले, हद्दवाढीवर नव्हे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या १८ गावांतील सरपंच आणि हद्दवाढविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हद्दवाढीला आपला विरोध का आहे, याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावेळी शाहू छत्रपती यांनी हे स्पष्टीकरण दिले.
शहरालगतच्या १८ गावांचा हद्दवाढीत समावेश केला तर बागायत शेती, पशुधन नष्ट होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे, असे शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात नागरी सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. कचरा, रस्ते, गार्डन, क्रीडांगणे यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेला जर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देता येत नसतील तर मग आम्हाला पुन्हा शहरात कशासाठी घेण्याचा आग्रह धरला जात आहे, अशी विचारणा यावेळी करण्यात आली.
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ कोल्हापुरात आल्या होत्या. त्यांनी पुण्याची अनेक वेळा हद्दवाढ झाली; परंतु त्या गावांना अजूनही महापालिका नागरी सुविधा देऊ शकलेली नाही, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे आम्ही शहरात आलो तर आम्हाला सुविधा मिळतील का, याबाबत आम्ही साशंक आहोत. जर महापालिकेने काही आराखडा तयार केला असेल तर तो दाखवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अनेक वर्षे शहराची हद्दवाढ झाली नाही, असे वारंवार सांगितले जात आहे. त्यात ग्रामीण भागातील नागरिकांचा काय दोष? हद्दवाढ करता आली नाही, हा राज्यकर्त्यांचा दाेष आहे, याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
शिष्टमंडळात उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे उत्तम आंबवडेकर, सरनोबतवाडीच्या शुभांगी आडसूळ, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, वळीवडेच्या रूपाली कुसाळे, गांधीनगरचे संदीप पाटोळे, मोरेवाडीचे ए. व्ही. कांबळे, माजी सरपंच अमर मोरे, कळंब्याच्या सुमन गुरव, मुडशिंगीचे अश्विनी शिरगावे, पाचगावच्या प्रियंका पाटील, गोकुळ शिरगावचे चंद्रकांत डावरे, कंदलगावचे राहुल पाटील, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, नायकू बागणे, किरण आडसूळ, भाग्यश्री पारखे यांचा समावेश होता.
मग कागलपर्यंतची गावे घ्याच
शाहू छत्रपती म्हणाले की, हद्दवाढ केल्याशिवाय कोल्हापूरची लोकसंख्या वाढत नाही आणि त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेत त्याचा समावेश होत नाही. त्यावर वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले म्हणाले, आमची २० गावे घेऊनही लोकसंख्या १० लाखांपर्यंत जात नाही. तेव्हा मग पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह कागलमधील गावेही घ्या.
जागा हडप करण्यासाठी का?
हद्दवाढ करा म्हणून आग्रह धरणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने जयप्रभा, शासकीय विश्रामगृहाचीही जागा सोडलेली नाही; त्यामुळे आमची गावेही अशा जागा हडप करण्यासाठीच तुम्हांला हवी आहेत का, अशी विचारणा गोकुळ शिरगावचे माजी उपसरपंच साताप्पा कांबळे यांनी बैठकीत केली.