लॉबिंगचा प्रयत्न : कोल्हापुरातील चित्रीकरणास मुंबईतून ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:11 IST2020-05-30T19:08:52+5:302020-05-30T19:11:00+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सध्या मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे सिनेसृष्टीची परंपरा, तंत्रज्ञ, व्यावसायिक, रेडी टू पब्लिश असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी साथ देत शनिवारी (दि.२३) चित्रीकरणासाठीची अधिकृत परवानगी दिली.

लॉबिंगचा प्रयत्न : कोल्हापुरातील चित्रीकरणास मुंबईतून ‘खो’
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे रखडलेल्या मालिका व चित्रपटांचे कोल्हापुरात चित्रीकरण करण्यास मुंबईतील काही व्यावसायिकांकडून ‘खो’ घातला जात आहे. चित्रीकरण कोल्हापूरला गेले तर आपला व्यवसाय बुडेल, या मानसिकतेतून लॉबिंग केले जात असून, कोरोनासंबंधीच्या नियमांबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांवर मुंबईत चित्रीकरण सुरू करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे पुढे आले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सध्या मुंबई-पुणे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे सिनेसृष्टीची परंपरा, तंत्रज्ञ, व्यावसायिक, रेडी टू पब्लिश असलेल्या कोल्हापुरात चित्रीकरण सुरू करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी साथ देत शनिवारी (दि.२३) चित्रीकरणासाठीची अधिकृत परवानगी दिली. मात्र, अद्याप एक जाहिरातवगळता चित्रीकरणासाठीची पावले पुढे सरकलेली नाहीत किंवा चॅनेल हेड, निर्मात्यांनी आपली मालिका येथे आणण्यासाठी हिरवा कंदील दाखविलेला नाही. यामागे मुंबईतील लॉबिंग हे मुख्य कारण असल्याचे येथील व्यावसायिकांच्या लक्षात आले आहे.
कोल्हापुरात चित्रीकरण सुरू झाले तर मुंबईतील व्यावसायिकांना फटका बसेल, या मानसिकतेतून तेथील निर्मात्या संस्थांवर दबाव टाकला जात आहे. वर्षानुवर्षांचे हितसंबंध तोडले तर आपल्याला पुढे अडचणी येतील, ही भीती तेथील कलाकार व निर्मात्यांना असल्याने त्यांच्याकडून सावध पावले टाकली जात आहेत.
क्वारंटाईनबद्दल गैरसमज
नवे प्रकल्प कोल्हापुरात सुरू होऊ नयेत यासाठी कोरोनासंबंधीच्या नियमावलींचा बाऊ केला जात आहे. कोल्हापुरात गेलात की तुम्हाला तेथे क्वारंटाईन व्हावे लागेल. मुंबईत परत येता येणार नाही. नियमावलींसंदर्भात शासनाचा अध्यादेश आलेला नाही, तिथे अडकून बसाल, मुंबईत काम करताना अडचणी येतील, असे गैरसमज पसरविले जात आहेत. मुंबईचे लोक इतके घाबरले आहेत की, अडचणीत सापडण्यापेक्षा आणखी एक महिना घरात बसण्याचीही त्यांची तयारी आहे. या राजकारणातून अनेकांनी कोल्हापुरात येण्याची इच्छा असतानाही अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.