पगारी पुजारी कायदा अंमलबजावणी करा अन्यथा, पुजारी हटाव आंदोलन; कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:51 IST2026-04-01T15:51:15+5:302026-04-01T15:51:37+5:30
पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा

पगारी पुजारी कायदा अंमलबजावणी करा अन्यथा, पुजारी हटाव आंदोलन; कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईसह जोतिबा मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करून ८ वर्षे झाली त्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतच मंजूर झाला. प्रत्यक्ष कृती झालेली नाही हे बहुदा शासन विसरलेले दिसते. तरी मुख्यमंत्र्यांनी तातडीने याबाबत महाराष्ट्रातील जनतेपुढे जाहीर खुलासा करावा, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे. अन्यथा शासनाला टोलसारख्या आंदोलनाप्रमाणे पुजारी हटाव आंदोलनाला तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वी पगार देऊन पुजारी नेमणूक करण्याचा कायदा पास केला. जनतेने या कायद्याचे स्वागत केले. विशेषतः कोल्हापूरच्या आई अंबाबाई मंदिरात व जोतिबा मंदिरामध्ये तातडीने पगारी पुजारी नेमून या मंदिरात देश व परदेशातील भाविक आई अंबाबाईच्या व जोतिबाच चरणी जे धन दान करतात ते सर्व धन सरकार जमा करून मंदिराच्या भाविकांच्या सोयी सोयी-सुविधांसाठीच वापरण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे.
टोलविरोधी आंदोलनात जनरेट्या पुढे शासनास माघार घ्यावी लागली होती याची जाणीव ठेवून अंबाबाई व जोतिबा मंदिरात तातडीने पगारी पुजारी नेमणूक कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा शासनाला टोलसारख्या आंदोलनाप्रमाणे पुजारी हटाव आंदोलनाला तोंड द्यावे लागेल. असा इशारा अशोक पोवार, रमेश मोरे, दिलीप देसाई, अजित सासणे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमटे, महेश जाधव, चंद्रकांत यादव, लहुजी शिंदे, विजय शिंदे, प्रसाद बुलबुले, महादेव जाधव, अमृत शिंदे, स. ना. जोशी . प्रा. शिवाजी पाटील, अण्णा देशपांडे, सदानंद सुर्वे, राजेश वरक, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा
जोतिबा डोंगर येथे काही भाविकांना पुजारी रूपातील दरोडेखोर गुंडांनी केलेल्या मारहाणीची चौकशी करावी. आज अखेर दोषींवर कारवाई का केली नाही याचाही खुलासा पोलिस प्रशासनाने करावा. अशा प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना शासनाने अभय देऊ नये तातडीने त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे अशा कडक कलमांचा गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणीही कृती समितीने केली.