माझी वसुंधरा अभियानात इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:41 IST2026-02-18T13:40:36+5:302026-02-18T13:41:00+5:30
यामध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता

माझी वसुंधरा अभियानात इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज भारी
कोल्हापूर : शासनाच्या पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकारी यांचे क्रमांक मंगळवारी जाहीर केले. यामध्ये तीन लाख लोकसंख्या गटात राज्यस्तरावर इचलकरंजी महानगरपालिकेने दुसरा क्रमांक मिळवला. पंचवीस हजार ते ४० हजार लोकसंख्या गटात राज्यस्तरावर कागल नगरपरिषद दुसरा आणि गडहिंग्लज नगरपरिषद तिसरा क्रमांक मिळवला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी गटात कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा दुसरा क्रमांक आला आहे. पुणे विभाग स्तरावर सर्वाेत्तम कामगिरीत कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची निवड झाली आहे.
जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे म्हणून करवीरचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांची निवड झाली आहे. एक जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० राबवण्यात आले. यामध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था आणि २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील निधी देण्यात येणार आहे.