Kolhapur Politics: माझं काही नाही... ए. वाय. आणि मंत्री मुश्रीफ यांचेच वांदे; के. पी. पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:32 IST2026-02-14T15:31:55+5:302026-02-14T15:32:31+5:30
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण लवकर करा

Kolhapur Politics: माझं काही नाही... ए. वाय. आणि मंत्री मुश्रीफ यांचेच वांदे; के. पी. पाटील यांचा टोला
कोल्हापूर : गडहिंग्लजमध्ये कुपेकर बहीण-भावाला, प्रकाश चव्हाण व अमर चव्हाण यांना एकत्र आणले त्याप्रमाणे ‘राधानगरी’मध्ये ‘के. पी. - ए. वाय.’ यांना एकत्र आणा म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळेल आणि अजित पवार यांना दिलेला शब्द पूर्ण करा, असे माजी आमदार राजेश पाटील यांनी आवाहन केले. तोच धागा पकडत माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, माझे आणि दाजी (ए. वाय. पाटील) यांचे काही नाही, ‘ए. वाय.’ व मुश्रीफ यांचे वांदे आहेत. परवा तर जिल्हा परिषदेच्या निकालादिवशी थेट मुश्रीफ यांच्या विरोधातच शड्डू ठोकला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात जोरदार टोलेबाजी रंगली. आपल्या रांगड्या शैलीत के. पी. पाटील म्हणाले, राजेश पाटील तुमची ताकद वाढली पण आमचा विधानसभेत ४२ हजारांनी पराभव झाल्यानंतर जिल्हा परिषदेला माणसं उभा करायला मिळेनात. एकीकडे पालकमंत्री तर दुसऱीकडे मंत्री चंद्रकांत पाटील ठिय्या मारून बसले होते. त्यांची सगळ्या प्रकारची ताकद लावल्याने आम्ही संकटात आलो. त्यामुळे पदांचे वाटप करताना जरा आमच्या दुष्काळी भागाकडे बघा.
जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मालेपासून तळसंदेपर्यंत परफेक्ट नियोजन केले आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला. पदे देताना पन्हाळा, शाहूवाडी मधील डोंगर कपाऱ्यांतील सदस्यांकडे लक्ष द्या. ‘कळे’, ‘कोतोली’ मतदारसंघात राहुल पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन आमच्या विरोधकांना पाठिंबा दिला, हे योग्य नसून ताठ मानेने काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
करवीरमध्ये नरकेंची काँग्रेसशी छुपी युती : राहुल पाटील
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, ‘करवीर’मध्ये आमचे विरोधक चंद्रदीप नरके यांची कॉंग्रेसशी छुपी हातमिळवणी होती. निगवे खालसामध्ये नरकेंनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आमचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पन्हाळ्यात निर्णय घेतला. अनेक अडचणी आल्या पण मंत्री हसन मुश्रीफ यांची ताकद आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या आशीवार्दाने यश मिळाले. यावेळी, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, मानसिंगराव गायकवाड, अरुण डोंगळे आदी उपस्थित होते.
आसुर्लेकरांना ‘के. पीं’.च्या शुभेच्छा
पन्हाळ्यात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांनी आमचे मित्र आणि डॉनला बाजूला करून तीन जागा जिंकल्या व पंचायत समिती ताब्यात घेतली. ‘बाबासाहेब’ तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, असे के. पी. पाटील यांनी सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण लवकर करा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा १९ जानेवारीला मला फोन करून चंदगडमध्ये तुम्ही काेणत्या चिन्हावर लढणार असे विचारले. क्षणाचाही विलंब न करता ‘घड्याळ’ चिन्हावर लढण्याची तयारी दाखवली. एकत्रीकरणाचा ‘चंदगड’ पॅटर्नने महाराष्ट्राला दिशा दिली. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर लवकर निर्णय घ्या, असे आवाहन नंदिनी बाभूळकर यांनी केले.