पत्नीच्या निधनानंतर पतीने तासाभरात सोडला प्राण; ६९ वर्षांच्या सहजीवनाचा शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 07:03 IST2021-04-05T03:17:12+5:302021-04-05T07:03:22+5:30
आजारपणात केले अन्न वर्ज्य

पत्नीच्या निधनानंतर पतीने तासाभरात सोडला प्राण; ६९ वर्षांच्या सहजीवनाचा शेवट
- सदाशिव मोरे
आजरा (जि.कोल्हापूर) : सुमारे ६९ वर्षे संसारात साथ देणाऱ्या सहचारिणीचा मृत्यु झाल्याचे दु:ख सहन न झाल्याने त्या दु:खावेगात पत्नीच्या मृत्युनंतर अवघ्या एका तासात पतीनेही प्राण सोडला. मडिलगे येथील इंगळे कुटुंबावर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला.
९५ वर्षीय दत्तू इंगळे यांना डोळ्याने दिसत नसल्याने पत्नी तानूबाई व सुनेच्या आधारावर त्यांचा दिनक्रम सुरू होता. १५ दिवसांपूर्वी भावजयीचा मृत्यू झाल्याने त्याचा धसका तानूबाईने घेतला आणि त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. मुंबईहून आलेल्या मुलाने तानूबाईंना उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. पत्नीला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच दत्तू यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. उपचार सुरु असताना शनिवारी तानूबाईंचा (८७) मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच तासाभरातच दत्तू यांचे निधन झाले. त्यांच्या ६९ वर्षांच्या सहजीवनाचा शेवट झाला.