सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी वाघाची किती पिल्ली लागतील?, जब्बार पटेल यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:47 IST2025-06-27T12:44:58+5:302025-06-27T12:47:14+5:30
शानदार समारंभात मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाच्या फाईलवर पंतप्रतिनिधीची सही व्हावी यासाठी त्यांच्यासमोर वाघाचे पिल्लू सोडले होते, अशी दंतकथा सांगितली जाते. देशातील स्थिती पाहता आता संविधानाप्रमाणे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी अशी वाघाची किती पिल्ली सांभाळावी लागतील, असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी गुरुवारी येथे उपस्थित केला.
शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही भावना व्यक्त केली. शाहूंचे कार्य आणि आजच्या स्थितीची टोकदार आणि तितकीच खुमासदार मांडणी केली. त्यांनी बोलतच रहावे, अशीच भावना सभागृहात व्यक्त झाली. त्यामुळे शाहूप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विचारांना दाद दिली.
प्रेक्षकांनी खचाखच भरलेले सभागृह, पोलिस बॅन्डची मानवंदना, शाहिरी मुजरा, जाणकार मान्यवरांची उपस्थिती, उत्साह आणि आनंदाने भारलेल्या वातावरणात शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांना मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रा. अशोक चौसाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, रोहित तोंदले, राजदीप सुर्वे उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉ. पटेल म्हणाले, शाहू महाराज यांनी कृतीतून मांडलेला समतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आणला. त्या काळात लोकशाही नसतानाही त्यांनी सामाजिक, मानवी मूल्यांची जपणूक करणारा राज्यकारभार केला. भारतात कुणाच्याही डोक्यात आले नव्हते तेव्हा शाहूंनी ५० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला व तो राबवून दाखवला. आता आपण कोणत्याही आरक्षणावरून किती वाद घालतो, हे पाहिले की शाहूंचे मोठेपण ध्यानात येते.
शाहू महाराज राजे म्हणून एकटेच होते, परंतु जीवनाचे एकही क्षेत्र असे नाही की ज्यामध्ये शाहूंनी काम केले नाही. शाहूंच्या विचारांमध्ये भारतीय व पाश्चात्य संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळतो. त्यांच्या राज्य कारभाराला माणुसकीचे कोंदण होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शाहू महाराज हे सर्वसामान्यांच्या हितासाठी अस्वस्थ होणारे राजे होते. त्यांच्यासारखी अस्वस्थता आम्हा राज्यकर्त्यामध्ये आली तरच समाज हिताचे काम करू शकतो. हीच खरी शाहू जयंतीची प्रेरणा असेल.
शाहूंच्या विचारावर देश, महाराष्ट्र चालतो. त्यांचेच विचार डॉ. पटेल यांनी कलाकृतीतून मांडले आहे. ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार शाहू छत्रपती यांनी काढले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात भारतीय संविधानाच्या मूलतत्त्वांची पेरणी राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. कोल्हापूरच नाही तर देशाचे प्रशासन शाहू महाराजांच्या संस्कारांवर आणि विचारांच्या आधारे सुरू असल्याचे सांगितले. डॉ. अशोक चौसाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मोहिनी चव्हाण यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहू गीत सादर केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.
पुरस्काराची रक्कम आनंदवन, अंनिससाठी..
एखादा माणूस आपल्यातले माणूसपण जपताना तो देवत्वाच्याही पलीकडे जातो. शाहू महाराज फक्त कोल्हापूरचे नव्हे तर देशाचे आणि देशाने अभिमानाने मिरवावे, असे राजे होते. त्यांच्या नावे पुरस्कार घेताना मला दडपण आले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी दुर्मीळ असल्याच्या भावना डॉ. पटेल यांनी व्यक्त केल्या. पुरस्काराची १ लाखाची रक्कम डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. प्रकाश आमटे यांच्या आनंदवन संस्थेला विभागून देत असल्याची घोषणा त्यांनी केली.
देशाचा राजा..
राजर्षी शाहू महाराज हे करवीर संस्थानचे राजे होते, असे आपण अभिमानाने सांगतो. परंतु त्यांचे काम तेवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. त्यांचे काम ते देशाचे राजे आहेत एवढे मोठे आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी त्यांना करवीरनगरीपुरते मर्यादित करू नये, असे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
शाहू महाराजांवर चित्रपट..
डॉ.पटेल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चित्रपट काढला आहे. आता ते महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढत आहेत. फुले,शाहू,आंबेडकर ही महाराष्ट्राची वैचारिक दैवते आहेत तेव्हा डॉ. पटेल यांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावरही चित्रपट काढावा, अशी मागणी या सोहळ्यात झाली.