कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय ?, राजू शेट्टींची विचारणा

By समीर देशपांडे | Updated: October 7, 2024 17:52 IST2024-10-07T17:51:58+5:302024-10-07T17:52:27+5:30

'शरद पवारही आतून तिकडचे'

Have the industrialists become bigger than the government, asks Raju Shetty | कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय ?, राजू शेट्टींची विचारणा

कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय ?, राजू शेट्टींची विचारणा

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ दोन, अडीचशे घराण्यांमध्येच सुरू आहे. त्या पलिकडे सामान्य परंतु नेतृत्व करू शकणाऱ्या नव्या चेहऱ्यांना सोबत घेवून आम्हांला या घराण्यापलिकडे राजकारण न्यायचे आहे. आघाडी आणि युती'त आलटून, पालटून दोन्हीकडे तीच तीच माणसे दिसतात. त्यामुळेच आम्ही हा तिसरा पर्याय काढला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

साखर हंगामाबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्यावर्षीच्या ऊसाला अजूनही २०० रूपये मिळावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. गेल्यावर्षभरात साखरेचे भाव ३६०० रूपयांपर्यंत राहिले आहेत. मोलॅसिस, इथेनॉल, बगॅसचे दरही वाढले. त्यामुळे माळेगाव, विठ्ठल साखर कारखान्याला जर ३६०० रूपये देता येतात तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातल्या धनदांडग्या साखर कारखानदारांना काय धाड मारली आहे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

'कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय' 

१५ नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करायचे असताना बॉयलर पेटले आहेत. त्याआधी कारखाने सुरू झाले तर नियमाप्रमाणे रोज प्रतिटन ५०० रूपयांचा दंड सरकारने वसूल केला पाहिजे. अन्यथा कारखानादार आमचे ऐकत नाही असे सरकारने तरी जाहीर करायला पाहिजे. कारखानदार सरकारपेक्षा मोठे झाले काय अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. आम्ही काय करायचे ते ठरवले आहे. महिनाभर आधी ऊस परिषद घेत आहोत. नाही तरी आम्ही ऊसाचा बुडका तयार ठेवलाच आहे असे ते म्हणाले.

'शरद पवारही आतून तिकडचे'

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते आणि ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळ इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही.

Web Title: Have the industrialists become bigger than the government, asks Raju Shetty