बकरी ईदची दुआ पूरग्रस्तांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:06 IST2019-08-12T17:04:36+5:302019-08-12T17:06:41+5:30
कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

बकरी ईदची दुआ पूरग्रस्तांसाठी
कोल्हापूर : कोल्हापूरसह महाराष्ट्रावर आलेले महापुराचे संकट दूर व्हावे, पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर पडता यावे, अशी दुआ करीत मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईदचे नमाज पठण केले. यानंतर अनेकांनी पूरग्रस्तांना धान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
बकरी ईदनिमित्त सोमवारी सकाळी मुस्लिम बोर्डिंग परिसरात मौलाना मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी महाराष्ट्रावरचे पुराचे संकट दूर होऊ दे, अशी दुआ केली. यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी खिरीचे वाटप केले व पूरग्रस्तांसोबत खीर खाऊन बकरी ईद साजरी केली.
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, रफिक मुल्ला, फारुख पटवेगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी जिल्ह्यातील नेतेमंडळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. मात्र यंदा अवघे कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी झटत असल्याने नेत्यांनीही येणे टाळत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. शहरातील विविध मस्जिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले.
बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देण्याची पद्धत आहे. मात्र हीच रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात यावी, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभरात अनेक मुस्लिम बांधवांनी गहू, तांदूळ, साखर, चहापूड, तेल, साबण असे जीवनावश्यक साहित्य पूरग्रस्तांना दिले.