शाहू छत्रपती मिलच्या जागेवर जागतिक दर्जाच्या स्मारकाची चौदा वर्षे प्रतीक्षाच, कोल्हापूरकरांची दिशाभूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:45 IST2026-02-21T12:42:34+5:302026-02-21T12:45:17+5:30
निधीची घोषणाचा प्रत्यक्षात कार्यवाही नाही

संग्रहित छाया
कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती मिलच्या जागेवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक करण्याच्या २०१२ पासून आतापर्यंत केवळ घोषणाच झाल्या आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारने स्मारकासाठी निधी नसल्याचे जाहीर करावे. या सर्व पार्श्वभूमीवर संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळातर्फे प्रयत्न सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष कमलाकर जगदाळे, सेक्रेटरी मदन जाधव यांनी दिली.
पर्यटकांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, पर्यटन क्षेत्राच्या कक्षा रुंदावताना स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळावी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी. शाहू मिल आणि कोटीतीर्थ तलाव परिसरातील ४० एकर जागेवर ‘राजर्षी शाहू छत्रपती मिल मेमोरियल’ या प्रकल्पाची घोषणा झाली. शाहू मिलच्या जागी ७५३ कोटींचा आराखडा तयार केला. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. तो प्रशासनाकडे मांडण्यात आला. मात्र त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.
या प्रकरणी श्री शाहू छत्रपती मिल परिसर विकास समितीने आंदोलन करून वेळोवेळी मागण्या केल्या. जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे ठरले. वस्त्रोद्योग विभागाकडून जागा हस्तांतरणाचा अहवाल उच्च अधिकार समितीकडे सादर करण्याचे ठरले होते. मात्र आतापर्यंत जागा हस्तांतरणाची चर्चाच झाली आहे. मुंबईत बैठका झाल्या, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.
राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे निधी उपलब्ध का होत नाही. सरकारकडून मदत मिळणार नसेल तर त्यांनी जाहीरपणे नागरिकांना सांगावे. शाहू मिल १८ नोव्हेंबर २००३ मध्ये बंद पडली. तेव्हापासून जिल्हा प्रशासन, महापालिका, राजकीय नेत्यांनी केवळ जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप उत्सव मंडळाने केला आहे.