जागतिक वन दिवस विशेष: पश्चिम घाट वन आच्छादनात १८०६ चौरस किलोमीटरने घट

By संदीप आडनाईक | Updated: March 21, 2025 13:11 IST2025-03-21T13:09:55+5:302025-03-21T13:11:12+5:30

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात घट

Forest cover in ecologically sensitive areas of Western Ghats reduced by 1806 sq km | जागतिक वन दिवस विशेष: पश्चिम घाट वन आच्छादनात १८०६ चौरस किलोमीटरने घट

संग्रहित छाया

संदीप आडनाईक

कोल्हापूर : पश्चिम घाटातील घनदाट वन आच्छादनामध्ये गेल्या दहा वर्षांत वाढ झाली असली, तरी गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील वन आच्छादनात १८०६ चौरस किलोमीटरने घट झाल्याची नोंद आहे.

निसर्गप्रेमींची चिंता वाढवणारी ही धक्कादायक नोंद २१ डिसेंबरला प्रसिद्ध झालेल्या ‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’ मध्ये नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्रात गेल्या १० वर्षांत ४.६४ चौरस किलोमीटर तर सातारा जिल्ह्यात १६.१५ चौरस किलोमीटरची घट झाली आहे.

२०१३ मध्ये ‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’ने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ‘डब्लूजीईएसए’मधील वन आच्छादन हे ९ हजार ८२५.०३ चौरस किलोमीटर होते. त्यानंतर आता दहा वर्षांनंतर केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे क्षेत्र ८ हजार ०१९.२८ चौरस किलोमीटर असल्याची नोंद आहे.

पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात घट

‘भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३’नुसार महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामधील (डब्लूजीईएसए) वन आच्छादनामध्ये १ हजार ८०५.७५ चौरस किलोमीटरने घट झाली आहे. २०१३ मध्ये ‘डब्लूजीईएसए’ची पहिली प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यावेळी पश्चिम घाटात ५९ हजार ९४० चौरस किलोमीटर क्षेत्र ‘डब्लूजीईएसए’ म्हणून अधिसूचित केले होते.

  • पश्चिम घाट हा ६ राज्यांमध्ये १ लाख ४० हजार चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे.
  • २०१२ मध्ये पश्चिम घाटाला ‘युनेस्को’चा जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला.
  • पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी हे संवेदनशील क्षेत्र ६० हजार ८२५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे.
  • यापैकी ५६ हजार ८२५ चौरस किलोमीटर क्षेत्र हे ३१ जुलै रोजीच्या प्रारूप अधिसूचनेनुसार अधिसूचित केले आहे.


ही आहेत कारणे..

  • २०१३ च्या तुलनेत २०२४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रारूप अधिसूचनेत पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राच्या क्षेत्रफळामध्ये घट केल्याने वन आच्छादन घट झाल्याचे दिसते.
  • उपग्रहाच्या माध्यमातून केलेले हे सर्वेक्षण संशयास्पद आहे. ही निव्वळ धूळफेक आहे. तसेच दाखवलेल्या नोंदीपेक्षा वन आच्छादन खूपच कमी झाले असण्याची शक्यता आहे.


वन आच्छादन (चौरस किमी)

जिल्हा : २०१३ : २०२३

कोल्हापूर : १,३२५.५० : १,३२०.८६
रत्नागिरी : १,६३८.८६ : १,६४४.९७
सांगली : ११३.२१ : ११३.२२
सातारा : ९५१.३३ :  ९३५.१८
सिंधुदुर्ग : १,२८१.९३ : १,३११.३०

Web Title: Forest cover in ecologically sensitive areas of Western Ghats reduced by 1806 sq km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.