Agricultural electricity issue: इचलकरंजी महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी सोडला साप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:02 IST2022-02-26T13:58:28+5:302022-02-26T14:02:44+5:30
साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते.

Agricultural electricity issue: इचलकरंजी महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी सोडला साप
इचलकरंजी : येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साप सोडला. या घटनेमुळे एकच धावपळ उडाली.
शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरु आहे. याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या संतापातून हा प्रकार घडला.
शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवत शेतात रात्रीच्या वेळी आढळणाऱ्या अन्य वन्य प्राण्यांनाही महावितरणच्या कार्यालयात आणून सोडण्यास शेतकरी मागेपुढे पाहणार नाहीत. असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी बसगोंडा बिरादार, अभिषेक पाटील, पुरंदर पाटील, संजय बेडक्याळे, गोवर्धन दबडे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे महावितरणचे उच्च पदस्थ अधिकारी, ऊर्जामंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री यांना लक्ष द्यायला वेळ नसेल तर आता शेतकऱ्यांनी “माझी शेती माझी जबाबदारी” या धोरणानुसार रात्री शेतात पाणी पाजत असताना स्वत:च खबरदारी आणि दक्षता घ्यावी.
शक्यतो साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन सर्व सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते.