‘पंचगंगा’ प्रदूषणाची दाहकता मुख्यमंत्र्यांसमोर मांडू: हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:56 IST2020-03-11T13:54:33+5:302020-03-11T13:56:30+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. त्याची दाहकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लवकरच मांडली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठीच्या निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोेग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी अमन मित्तल, मल्लीनाथ कलशेट्टी, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर : जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. त्याची दाहकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लवकरच मांडली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठीच्या निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
जिल्ह्याच्या विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.१६) मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विधान भवन येथे होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
यावेळी खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पूर्ण पडझड झालेल्या घरांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करण्याबाबत दोन्ही खासदारांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. वीजेच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू. चंदगडमधील पाटणे येथील ट्रॉमा सेंटरच्या जागेचा प्रश्न मार्गी लावला जाईल.
शाहू मिल येथे स्मारकाबाबत आराखडा तयार करावा. मुख्यमंत्र्यांसमोर जिल्ह्यातील विकासाचे महत्त्वाचे प्रश्न निश्चितपणे मांडले जातील, असे मुश्रीफ म्हणाले. त्याचबरोबर अपूर्ण प्रकल्पांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घ्यावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
पालकमंत्री पाटील म्हणाले,अपूर्ण प्रकल्पांबाबत एक एक प्रकल्पाचा विषय घेऊन बैठक लावू. शिवभोजन ही योजना तालुकास्तरावर राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू. शाहू मिल येथील स्मारकाचा विषय मार्गीलावण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे प्रयत्न करू. अंबाबाई तीर्थ क्षेत्र आराखड्याबाबत यावर्षी २५ कोटींच्या निधीसाठी त्याचबरोबरच नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी १७८ कोटी निधीसाठी प्रयत्न केला जाईल.
लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील ५ विषय द्यावेत : पालकमंत्री
लोकप्रतिनिधी मतदार संघ निहाय ५ विषय द्यावेत, ट्रॉमा सेंटरची काय समस्या आहे त्याबाबत सविस्तर अहवाल द्या. त्याचबरोबरच पूरपरिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या आरोग्य केंद्रांच्या इमारती, साधनसामग्री याबाबतचा अहवाल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांना द्यावा, असे निर्देश देऊन आरोग्य विभागाच्या ३५ कोटी निधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.
‘कन्यागत’चा उर्वरित निधी लवकरच आणू : यड्रावकर
कन्यागत महापर्वचा उर्वरित राहिलेला निधी जिल्ह्यासाठी आणला जाईल. पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे, त्याबाबतही निर्णय घ्यावा लागेल, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह विविध विषयांचा आढावा
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची स्थिती, दुरुस्ती व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कामांची सद्य:स्थिती, जिल्ह्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांचा आढावा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषी पंपासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रलंबित अर्ज, वीज जोडणीसाठी प्राप्त अर्ज व वीज जोडणी दिलेल्या अर्जांची संख्या, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे, उद्दिष्ट व साध्य, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, आरोग्य सुविधा व राष्ट्रीय कार्यक्रम, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, महानगरपालिकेचे महत्त्वाचे प्रश्न या विषयांवर या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.