नियुक्ती ठोक मानधनावर; तरीही जीवघेण्या संकटांशी सामना, कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात ७६ पदे रिक्त
By उद्धव गोडसे | Updated: March 9, 2026 16:19 IST2026-03-09T16:18:39+5:302026-03-09T16:19:40+5:30
जंगली प्राण्यांना पकडण्याचेही काम

नियुक्ती ठोक मानधनावर; तरीही जीवघेण्या संकटांशी सामना, कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात ७६ पदे रिक्त
उद्धव गोडसे
कोल्हापूर : कुठे आग लागलेली असो वा नैसर्गिक आपत्ती...मदतीसाठी पहिला कॉल जातो तो अग्निशमन दलास. स्वतःचा जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान संकटग्रस्तांना वाचवतात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात तब्बल ७६ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या ६२ पदांपैकी ४३ कर्मचारी ठोक मानधन तत्त्वावर काम करतात. तरीही संकट काळात ते मदतीसाठी धावून जातात आणि आपले कर्तव्य चोखपणे बजावतात.
आगीच्या घटनांसह झाड पडणे, घरांची पडझड, विजेचा धक्का, झाडांवर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांना मुक्त करणे, गटर्समध्ये अडकलेली जनावरे सुखरूप बाहेर काढणे...अशा अनेक दुर्घटनांमध्ये अग्निशमन दलाचे जवान मदतीला धावून जातात. लोकांना वाचवताना जीवघेण्या संकटांशी त्यांचा सामना होतो. आगीच्या ज्वाला झेलत ते लोकांना सुखरूप बाहेर काढतात. कधी झाडांवर चढावं लागतं, तर कधी उंच इमारतींवर लटकावं लागतं. वायुगळती रोखताना स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव असूनही ते जखमीचे काम फत्ते करतात.
कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली भीषण आग विझविली. गगनबावडा आणि शाहूवाडी मार्गावर टँकर उलटून झालेली वायू गळती रोखली. सर्किट बेंचसमोर रस्त्यावर पडलेले भले मोठे झाड अवघ्या दोन तासांत हटवले. अनेकदा पंचगंगेत बुडणाऱ्यांना वेळीच बाहेर काढून जीवदान दिले. जोखमीचे काम करताना जवानांना किरकोळ दुखापती होतात. साधनसामग्रीचा वापर, प्रशिक्षण आणि कामातील कौशल्यामुळे मोठ्या दुर्घटना टाळणे शक्य होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे शहरात सहा फायर स्टेशन आहेत. अधिकारी आणि जवानांसह एकूण १३८ पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ ६२ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यातील १९ कर्मचारी कायमस्वरूपी वेतन तत्त्वावर आहेत, तर ४३ कर्मचारी ठोक मानधन तत्त्वावर राबतात. शहरासह ग्रामीण भागातही ते मदतीला पोहोचतात. कामाचा प्रचंड ताण आणि अपुरे मनुष्यबळ असूनही ते जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी २४ तास सज्ज असतात.
जंगली प्राण्यांना पकडण्याचेही काम
अग्निशमन दलाच्या कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे जंगली प्राण्यांचा शहरात शिरकाव होत असल्याने त्यांना पकडणे, अटकाव करणे, त्यांचे हल्ले रोखण्याचेही काम जवानांना करावे लागते. शहरात आलेल्या बिबट्यांना पकडण्यात आणि गव्यांना हुसकावून लावण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
संकटात सापडलेल्या जिवांचे रक्षण करणे हे आमचे ब्रीद आणि प्रथम कर्तव्य आहे. कायमस्वरूपी नियुक्तीचा मुद्दा प्रशासनाचा आहे. आमचे सर्व कर्मचारी नेहमीच पूर्ण योगदान देऊन सेवा बजावतात. - मनीष रणभिसे, अग्निशमन दल प्रमुख