अंबाबाई मंदिर परिसराचे महिन्याभरात मूल्यांकन; भूसंपादनासाठीची कार्यवाही सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:32 IST2026-04-10T13:31:41+5:302026-04-10T13:32:29+5:30
दहा मीटर परिसरातील मिळकतीचे संपादन होणार, समितीच्या बैठकीत निर्णय

अंबाबाई मंदिर परिसराचे महिन्याभरात मूल्यांकन; भूसंपादनासाठीची कार्यवाही सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखडाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराभोवतीच्या परिसरातील जागेचे संपादन करण्यात येणार आहे. या परिसरातील मिळकतींचे व जागेचे मूल्यांकन करून महिनाभरात त्याचा भूसंपादन अहवाल शासनाला सादर करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अंबाबाई १४०० मंदिराच्या कोर्टीच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्यांचे काम सध्या सुरू झाले आहे. सध्या मंदिराच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. त्याचवेळी पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठीची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.
या समितीची बैठक गुरुवारी झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, नायब तहसीलदार ऋतुराज निकम, देवस्थान समितीचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह महापालिका, भूसंपादन, मुद्रांक शुल्क, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये महाद्वारातील मंदिराला लागून असलेल्या दहा मीटर परिसरातील मिळकर्तीचे संपादन केले जाणार आहे. पूर्व उत्तर व दक्षिण दरवाजाकडील मिळकती संपादित केल्या जाणार आहेत. येथे एकूण मिळकती किती आहेत त्यामध्ये रहिवासी किती आणि व्यावसायिक किती त्या मिळकतींच्या बांधकामाचा एरिया किती आहे, मिळकतींमध्ये काही न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे आदी सर्वेक्षणाद्वारे तपासल्या जाणार आहेत.
अशी होईल पुढील कार्यवाही
अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने स्थानिक पातळीवरील समितीला कमीत कमी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देता येईल या दृष्टीने पर्याय सुचवायला सांगितले आहे. स्थानिक पातळीवर प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली ही समिती मिळकतींचा मूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल.
जिल्हाधिकारी त्यांचा निष्कर्षांचा अहवाल नगर विकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करतील. त्यावरून ही समिती भूसंपादनाच्या रकमेचे अंतिम निर्णय घेईल.
मूल्यांकनानुसार मिळणार भरपाई
सर्वेक्षणाच्या आधारावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या जमिनीचे मूल्यांकन केले जाईल. त्या मूल्यांकनानुसार मिळकत धारकांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. संबंधित सर्व विभागाने पुढील महिन्याभरामध्ये या मिळकतींचे सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल समितीला सादर करायचा आहे. या अहवालावरून समर्पक निष्कर्ष काढून तो शासनाला सादर केला जाणार आहे. शासनाकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर मिळकतधारकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल.
या मिळकतींचे होणार संपादन
पूर्व बाजू : सरलष्कर भवन, शेतकरी बाजार, वसंत मेडिकल अजब पुस्तकालयपर्यंतचा संपूर्ण परिसर.
पश्चिम बाजू : अंबाबाई मुख्य रस्त्यापर्यंतचा परिसर. महाद्वार ते जोतिबा रोडपर्यंतच्या दहा मीटर परिसरातील मिळकती मंदिराच्या महाद्वारापासून
उत्तर बाजू : जोतिबा रोडवरील मंदिराच्या दरवाजाला लागून असलेले मिळकती.
दक्षिण बाजू : मंदिराच्या दरवाजापासून पुढे विद्यापीठ हायस्कूल, राजाज्ञ वाड्यापर्यंत.