विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ३३ हजार मतदार, कोणत्या तालुक्यात सर्वाधिक नोंदणी.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:49 IST2025-06-28T11:48:36+5:302025-06-28T11:49:24+5:30
आठ महिन्यांतील चित्र

विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वाढले ३३ हजार मतदार, कोणत्या तालुक्यात सर्वाधिक नोंदणी.. वाचा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ३३ हजार ३७४ मतदार वाढले आहेत. यात सर्वाधिक वाढ शिरोळ तालुक्यात आहे. येथे ७ हजार २६६ मतदार वाढले आहेत. त्यातही महिलांची संख्या अधिक आहे. आठ महिन्यांत फक्त ५ तृतीयपंथीयांनी मतदार नोंदणी केली आहे. वाढलेल्या मतदानात बहुतांशी युवा मतदारांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेली वाढ पुन्हा चर्चेची झाली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघासह देशात अचानक मतदारांची संख्या वाढल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किती मतदार वाढले, याची ‘लोकमत’ने चौकशी केली.
विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात ३३ लाख ०५ हजार ०९८ मतदार होते. आठ महिन्यांत ही संख्या ३३ हजार ३७४ ने वाढली आहे. जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदार पुनरीक्षण उपक्रम हा वर्षभर चालवला जातो. या अंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मृत, स्थलांतरित मतदारांची नावे कमी करणे, पत्ता बदल असे सर्व प्रकारचे कामकाज केले जाते. त्याअंतर्गत मागील आठ महिन्यांत ही वाढ दिसून आली आहे.
तालुका : वाढलेले पुरुष मतदार : वाढलेले स्त्री मतदार : एकूण
शिरोळ : २८६६ : ४३९९ : ७२६६
हातकणंगले : १८०१ : ३०४१ : ४८४२
कोल्हापूर दक्षिण : १८२६ : २४६२ : ४२९१
इचलकरंजी : १५७४ : २५२९ : ४१०५
शाहूवाडी : १३३८ : १६५७ : २९९५
चंदगड : ९०८ : १३८६ : २२९३
करवीर : ८७९ : १३७३ : २२५
राधानगरी : ८७२ : ११२१ : १९९३
कागल : ६३३ : ११९० : १८२३
कोल्हापूर उत्तर : ६९८ : ८१६ : १५१४
एकूण : १३ हजार ३९५ : १९ हजार ९७४ : ३३ हजार ३७४
महिला मतदारांत अधिक वाढ
वाढलेल्या मतदारांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात १३ हजार ३९५ पुरुष तर १९ हजार ९७४ महिला मतदारांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही शिरोळमध्ये सर्वाधिक ४ हजार ३९९ महिला मतदार वाढले आहेत.
विधानसभा निवडणुकीला वर्ष झाले नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना ३३ हजार मतदार वाढले आहेत. ते कसे वाढले हे संबंधित विभागाने स्पष्ट करावे. - सचिन चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस
विरोधी पक्षांनी आता मतदार संख्या, ईव्हीएम मशीनला दोष देणे सोडावे. आपला पराभव स्वीकारून नव्याने कामाला सुरुवात करावी. - विजय जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर