कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:35 IST2026-01-27T16:35:15+5:302026-01-27T16:35:31+5:30
निवडणुका मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता : दहावी, बारावीच्या परीक्षांचा अडथळा

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढले आहेत. पण, दहावी व बारावीच्या परीक्षा असल्याने निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. साधारणता एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक घेतली जाऊ शकते.
जानेवारी ते डिसेंबर २०२६ अखेर पर्यंत जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तत्पूर्वी तिथे निवडणूक प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते. पण, नगरपालिका, महापालिका व त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. मुदत संपल्याने तिथे प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. पण, तोंडावर असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा पाहता या निवडणुका वेळेत होण्याची शक्यता मावळली आहे.
‘करवीर’, ‘कागल’मधील सर्वाधिक ग्रामपंचायती
जिल्ह्यात मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक करवीर व कागल तालुक्यातील ग्रामपंचायती आहेत. यामध्ये हातकणंगले २२, शाहूवाडी ४२, पन्हाळा ४३, चंदगड ४२, आजरा २६, भुदरगड ४६, गडहिंग्लज ४३, राधानगरी १९, गगनबावडा ९, कागल ५४, करवीर ५३, शिरोळ ३४.