हरवलेले ३० लाख किमतीचे २५० मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत

By सचिन भोसले | Updated: December 9, 2023 00:51 IST2023-12-09T00:50:50+5:302023-12-09T00:51:43+5:30

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत मोबाईल संच हरविल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या.

250 lost mobiles worth 30 lakhs returned to original owners | हरवलेले ३० लाख किमतीचे २५० मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत

हरवलेले ३० लाख किमतीचे २५० मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत

कोल्हापूर : कष्टाच्या पैशातून हजारो रुपये घालून खरेदी केलेला मोबाईल जेव्हा हरवतो किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरी झाला की आपण हताश होवून तो परत मिळेल ही आशा सोडून देतो. औपचारिकता म्हणून पोलिसांत तक्रार नोंदविली जाते. मात्र, अशाच दाखल झालेल्या तक्रारीचा छडा लावून सायबर पोलिस ठाणेच्या पथकाने ३० लाख किंमतीचे अडीचशे मोबाईल शोधून ते शुक्रवारी पुन्हा मुळ मालकांना परत दिले.

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत मोबाईल संच हरविल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. त्या तक्रारीतील आयएमईआय एकत्रित करून सायबर पोलिस ठाणेच्या पथकाने संबधित  मोबाईल कंपनीशी संर्पक साधला. त्यांचा सीईआयआर पोर्टलचा वापर करून हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यानूसार सायबर ला सुचना दिल्या. त्यांच्या सूचनेनूसार पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथकांची नेमणुक केली. या पथकांनी कर्नाटक, हैदराबाद , गोवा, कोकण, पुणे, मुंबई आदी ठिकाणाहून हे गहाळ आणि चोरी झालेले तब्बल २५० आणि ३० लाख किमतीचे मोबाईल शोधून काढले. परत मिळवलेले मोबाईल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते व  जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत गुरुवारी  मुळ मालकांना परत दिले. नागरीकांना काडीमात्र अपेक्षा नसताना ते मोबाईल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.

यांच्या सातत्यपुर्ण कामगिरीचे फळ
जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनूसार अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, अतिष म्हेत्रे , अंमलदार सागर माळवे, महादेव गुरव, अमर वासुदेव, रविंद्र पाटील, सचिन बेंडखळे, प्रदीप पावरा, अजय सावंत, विनायक बाबर,सुरेश राठोड, दिलीप पोवार, रविंद्र गाडेकर, विशाल पाटील, सुहास पाटील, विक्रम पाटील, संगीता खोत, रेणूका जाधव गेले वर्षभरापासून सातत्याने परिश्रम घेवून हे मोबाईल शोधून काढले आहेत. 

जास्तीत जास्त नागरीकांना ओळख पटवून परत देण्याच्या सुचना
मोबाईल आयएमईआय क्रमांक व कागदपत्रांची ओळख पटवून जास्तीत जास्त नागरीकांना मिळालेले मोबाईल परत देण्यात आले. यासाठी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त मोबाईल परत द्यावेत. अशा सुचना विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी यांनी सायबर च्या पथकाला दिल्या.
 

Web Title: 250 lost mobiles worth 30 lakhs returned to original owners