काळम्मावाडीमध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:19 IST2016-04-04T00:10:51+5:302016-04-04T00:19:23+5:30
पाण्यात काटकसर हवी : ४.३१ टी.एम.सी. पाणी वापरात येणार; वेळापत्रक पाळणे गरजेचे

काळम्मावाडीमध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा
सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणामध्ये मार्चअखेर २४.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजे धरणात ६.३१ टी.एम.सी. इतके पाणी असले तरी प्रत्यक्षात ४.३१ टी.एम.सी. पाणी वापरासाठी येऊ शकते. पावसाळ्याला अजून तीन ते चार महिन्यांचा अवधी असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नदी वा कालव्याच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या वेळापत्रकाचे पालन करणे गरजेचे आहे.
काळम्मावाडी प्रकल्पातील पाणी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील गावांना वरदायी आहे. धरणातील जवळपास चार टी.एम.सी. पाणी कर्नाटक राज्याला देणे बंधनकारक आहे. गत पर्जन्यमानाचा विचार करून यावर्षी जवळपास एक टी.एम.सी. पाण्याची कपात करण्यात आली आहे. गतसालच्या पाणीसाठ्याचा विचार करता चालू वर्षी ८.६८ टी.एम.सी. पाणीसाठा कमी आहे. धरणात ६.३१ टी.एम.सी. पाणीसाठा असला तरी त्यापैकी मृतसाठा दीड टी.एम.सी. आहे. बाष्पीभवनाचा विचार करता केवळ ४ टी.एम.सी. पाणीसाठा वापरात येऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ते काटकसरीने वापरात येऊ शकते. धरणातून वा कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन संबंधित विभागाकडून होणे आवश्यक आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून बागायतदार शेतकरी यांनी अडथळे आणले तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो?
शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांनी क्षेत्रातील भागाची पाहणी करूनच पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची बचत व पाण्याचा कमी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन मेळावे घेणे आवश्यक आहे.
पाणी नियोजनासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. काही शेतकरी रात्रीचे पाणी शेतात सोडून घरात निवांत करीत आहेत. पाणी पिकाऐवजी रस्त्यावर येत आहे. त्यांच्यावर कारवाई होणे अवाश्यक आहे. पाणीसाठा कमी होत आहे. धरणाने इतका ४.८१ टी.एम.सी. पाण्याचा तळ गाठण्याची स्थिती ही इतिहासात प्रथमच घडली आहे.