Bandh: कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात २० गावांत आज बंद; कृती समितीचा मंत्री आबिटकर, मुश्रीफांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:45 IST2025-06-17T12:44:33+5:302025-06-17T12:45:10+5:30

..तर निवडणुकांवर बहिष्कार

20 villages to observe bandh today against Kolhapur boundary extension | Bandh: कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात २० गावांत आज बंद; कृती समितीचा मंत्री आबिटकर, मुश्रीफांना इशारा 

Bandh: कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात २० गावांत आज बंद; कृती समितीचा मंत्री आबिटकर, मुश्रीफांना इशारा 

कोल्हापूर : ज्यांच्या तालुक्यातील एक गावही हद्दवाढीत जात नाही, असे नेते हद्दवाढीचे समर्थन करत आहेत. आम्हाला विश्वासात न घेता हद्दवाढ केली तर त्याची किंमत मोजावी लागेल, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आज, मंगळवारी वीस गावे बंद ठेवून हद्दवाढीला विरोध करणार असल्याचेही त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हद्दवाढ विरोधी समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण म्हणाले, सोयी-सुविधा मिळत नाहीत म्हणून कोल्हापूरचे नागरिक लोकप्रतिनिधींच्या नावाने रोज शंख करत आहेत. कोणाच्या तरी हट्टापायी हद्दवाढीचा घाट घातला असून, तो हाणून पाडू. प्रसंगी न्यायालयात जाऊन ग्रामीण जनतेची ताकद दाखवू.

गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले, आमच्या गावांच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन केले, पण गेल्या आठ वर्षात एक रुपयाचा निधीही दिला नाही. चार-पाच गावे हद्दवाढीत घेऊन इंग्रजांसारखी तोडा आणि फोडाची निती कोणी अवलंबत असेल तर रस्त्यावरच्या संघर्षाला तयार राहा. पालकमंत्र्यांकडे दोनदा भेटीची वेळ मागितली, पण त्यांनी दिली नाही. ग्रामीण पदाधिकाऱ्यांना हलक्यात घेऊ नका, आमचीही ताकद दाखवू. यावेळी बालिंगेचे सरपंच अजय भवड, संग्राम पाटील, आदी उपस्थित हाेते.

‘कागल’ला घेऊन हद्दवाढ करा

ज्या नेत्यांचा हद्दवाढीबाबत आग्रह आहे, त्यांनी जरा उपनगरात जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत. हद्दवाढ केल्याचे श्रेय महापालिका निवडणुकीत घेण्यासाठी ग्रामीण जनतेला बळी देणार असाल तर याद राखा. हद्दवाढ करायची असेल तर पहिल्यांदा ‘कागल’ला घ्या, असे वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले यांनी सांगितले.

..तर निवडणुकांवर बहिष्कार

कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन महापालिकेला देणार नाही. पहिल्या टप्प्यात चार-पाच गावे घेऊन आमच्यात फूट पाडण्याचा उद्योग नेत्यांनी करू नये. शासनाने चुकीचा निर्णय घेतला तर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर यांनी दिला.

Web Title: 20 villages to observe bandh today against Kolhapur boundary extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.