Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

By उद्धव गोडसे | Updated: May 27, 2025 19:29 IST2025-05-27T19:28:46+5:302025-05-27T19:29:04+5:30

बेफिकिरी जिवावर बेतते

123 accidents 37 deaths on Pune Bengaluru highway in Kolhapur Travel dangerous due to widening work | Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर १२३ अपघात, ३७ बळी; रूंदीकरणाच्या कामामुळे प्रवास धोकादायक

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. मागील १२० दिवसांत (चार महिने) कागल ते पेठ नाक्यादरम्यान १२३ अपघात झाले. यात ३७ जणांनी जीव गमावला, तर ३९ जण गंभीर जखमी झाले. टोप ते अंबप फाट्यादरम्यान तीन दिवसांत दोन मोठे अपघात झाले. पावसाळ्यात अपघातांचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शासकीय यंत्रणांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

संपूर्ण देश दक्षिणोत्तर जोडणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच याच्या रूंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, रखडलेली कामे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान १०३ अपघातांची नोंद झाली होती.

यंदा पहिल्या ४ महिन्यांत १२३ अपघात झाले. यात ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ३९ जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, पावसाळ्याच्या तोंडावर हा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

रखडलेल्या कामांमुळे धोका वाढला

महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान उड्डाणपूल आणि मोऱ्यांचे काम अजून सुरूच आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे कामही रखडले आहे. सर्व्हिस रोड उपलब्ध नाहीत. सूचना फलक लावले जात नाहीत. महामार्गावर स्थानिक वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

पोलिसांनी दिल्या सूचना

पावसाळ्यात अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला खबरदारीच्या उपाययोजनांचे पत्र पाठवले आहे. त्यात सखल भागात पाणी साचू नये, काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, धोकादायक झाडे हटवावीत, पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवावी, सूचना फलक लावावेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.

बेफिकिरी जिवावर बेतते

अपघात होण्यास महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम कारणीभूत आहेच, पण वाहनचालकांची बेफिकिरीही तितकीच कारणीभूत ठरते. बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. कार आणि मालवाहतूक करणारी वाहने लेनमधून बाहेर पडताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. यामुळे अपघात वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जानेवारी ते एप्रिल २०२५ मधील अपघात (कागल ते पेठ नाका)

  • एकूण अपघात : १२३
  • प्राणांतिक अपघात : ३७
  • गंभीर अपघात : ३९
  • किरकोळ अपघात : १४
  • बिगर दुखापत : ३३

पुणे-बंगळुरू महामार्गावर कागल ते पेठ नाक्यादरम्यान अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे पत्र महामार्ग प्राधिकरणाला पाठवले आहे. लवकरच यातील कामांना सुरुवात होईल. - सत्यराज घुले, पोलिस निरीक्षक, महामार्ग

Web Title: 123 accidents 37 deaths on Pune Bengaluru highway in Kolhapur Travel dangerous due to widening work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.