उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत
By मुरलीधर भवार | Updated: September 14, 2022 20:38 IST2022-09-14T20:37:52+5:302022-09-14T20:38:36+5:30
डोंबिवली- उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार आहे. त्यासाठीचा जीआर देखील लवकर काढला जाईल असे आश्वास उद्योग मंत्री उदय ...

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत
डोंबिवली- उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार आहे. त्यासाठीचा जीआर देखील लवकर काढला जाईल असे आश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले आहे. सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात सर्टर्डे क्लबच्या वतीने उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला उपस्थित असलेले उद्योग मंत्री सामंत यांनी उपरोक्त आश्वासन दिले आहे. प्रसिद्ध यशस्वी उद्योजक हनुमंत गायकवाड यांच्यासह क्लबचे संतोष पाटील, विनीत बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत कर्ज मागणाऱ्या युवा पिढीच्या उद्योजकांची कर्ज प्रकरणे झीरो रिजेक्शन तत्वावर मंजूर करण्यात यावी. त्यांची बँकाकडून हॅरासमेंट करण्यात येऊ नये. त्यांची हॅरासमेंट केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सामंत यांनी दिला आहे.
डोंबिवलीतील 156 कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी उद्योग मंत्री सामंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्याविषयी उद्योजक संघटनेशी चर्चा करुन त्यावर बैठक घेतली जाईल. चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर डोंबिवली एमआयडीसीबाबत वारंवार प्रदूषणाच्या घटना घडतात त्यावर उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, उद्योजक आणि प्रदूषण नियंत्रण मंडळलासोबत या भागाचा येत्या आठ दिवसात दौरा केला जाईल. प्रदूषण होऊ नये यासाठी सूचना केली जाईल. वारंवार सांगूनही परिस्थिती बदलली नाही तर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अडीच वर्षात राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांची यादीच उद्या जाहीर करणार...
अडीच वर्षात महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले याची उद्या मी यादीच जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट मंत्री सामंत यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प बाहेर जात असल्याची टीका केली होती. त्या टीकेला सामंत यांनी उत्तरही दिले आहे. येणाऱ्या वर्षभरात महाराष्ट्रातील मराठी उद्योजक दीड लाख रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. त्याला राज्य सरकारही त्याला मदत करणार असल्याची माहिती मंत्री सावंत यांनी दिली आहे.