डोंबिवलीतील आयरेगाव टावरे पाड्यात पाणी टंचाई
By मुरलीधर भवार | Updated: February 24, 2026 16:57 IST2026-02-24T16:57:13+5:302026-02-24T16:57:13+5:30
ही पाणी टंचाई सोडविण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे.

डोंबिवलीतील आयरेगाव टावरे पाड्यात पाणी टंचाई
मुरलीधर भवार, डाेंबिवली: डाेंबिवलीतील आयरे गाव टावरे पाड्यात पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागतो. या भागातील नागरीकांना विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. १५ लिटरचे कॅन दरराेज नागरीकांना विकत घ्यावे लागतात. ही पाणी टंचाई सोडविण्याकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याची बाब समोर आली आहे.
आयारे गावातील टावरे पाड्यात पाण्यासाठी प्रत्येक पाण्याच्या कॅनला २०० रुपये मोजावे लागत आहे. याठिकाणी चाळीची वस्ती आहे. तसेच बहुतांश प्रमाणात नव्याने इमारती उभारण्यात आल्या आहे. चाळीत आणि इमारतीत घर घेतले. मात्र त्याठिकाणी पाण्याचा पत्ता नाही. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वीपासून राहणारे रहिवासी आहे. त्यांना देखील पाण्यासाठी वणवण करावी लागते.
सायकला पाण्याचे कॅन लटकवून पाणी आणावे लागते. तर काही रिक्षा चालक पाण्याचे क’न रिक्षात भरुन पाणी वाहतानाचे चित्र या परिसरात आहे. या भागात पाणी नाही तर पाणी विकणारे पाणी कुठून आणता असा संतप्त सवाल नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या १० वीची परिक्षा सुरु आहे. घरात पाणी नसल्याने पालकांना पाल्यासाठी वेळ देता येत नाही. त्यांच्या घरातील कामे खोळंबतात. पाणी टंचाईमुळे नागरीकांना विकतचे पाणी घेण्यावर पैसा खर्च करावा लागताे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे.
या संदर्भात या भागातील भाजपचे नगरसेवक मंदार टावरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काही भागात तांत्रिक अडचणींमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात अंतर्गत जलवाहिनीचे टाकण्याचे काम सुरु आहे. ही जलवाहिनी टाकल्यावर सर्व पाणीपुरवठा करण्यात येईल, हा परिसर टावरे यांच्या प्रभागाला लागून आहे. तरी देखील त्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केले आहे याकडे टावरे यांनी लक्ष वेधले आहे.
दोन वर्षापूर्वी आयरे टावरे पाड्यापासून जवळच असलेल्या भोपर संदप परिसरातील खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार जणांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या परिसरातील पाणी टंचाई लवकर सोडविली गेली नाही तर पुन्हा कोण्याच्या तरी जीवावर बेतू शकते.