बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू; गर्दीने घेतला डोंबिवलीच्या सोहमचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:30 IST2026-02-10T16:22:16+5:302026-02-10T16:30:27+5:30
परीक्षेसाठी निघालेल्या डोंबिवलीतील १२वीच्या विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू; गर्दीने घेतला डोंबिवलीच्या सोहमचा बळी
Dombivli Train Accident: राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परीक्षेसाठी घरातून निघालेला १८ वर्षांचा सोहम सचिन कटरे हा विद्यार्थी नियतीच्या क्रूर खेळाचा बळी ठरला. कळवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सोहमचा जागीच मृत्यू झाला.
डोंबिवली येथे राहणाऱ्या सोहमचे परीक्षा केंद्र कळवा येथील मनीषा विद्यालय येथे होते. आज बारावीचा पहिलाच पेपर असल्याने सोहम परीक्षेचे साहित्य घेऊन सकाळी घरातून निघाला होता. सकाळची वेळ असल्याने रेल्वेमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. सोहम सुद्धा या गर्दीतून वाट काढत लोकलमधून प्रवास करत होता. मात्र, कळवा-मुंब्रा दरम्यान गर्दीच्या रेट्यामुळे सोहमचा लोकलमधून तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली कोसळला.
धावत्या गाडीतून खाली पडल्याने सोहमला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सोहमचे आई-वडील आपल्या मुलाने पेपर चांगला लिहावा म्हणून शुभेच्छा देऊन वाट पाहत होते, मात्र त्यांना सोहमच्या मृत्यूची बातमी मिळाली. दुसरीकडे सोहमच्या भावाने परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती सोय करावी अशी मागणी केली आहे.
रेल्वे गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सोहमच्या या मृत्यूमुळे मध्य रेल्वेवरील जीवघेण्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी लोकलचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, याच प्रवासाने एका विद्यार्थ्याचा जीव घेतल्याने डोंबिवली परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.