भारतात 'इथे' सगळे भाऊ एकाच तरूणीशी करतात लग्न, कारण काय आणि कसा चालतो त्यांचा संसार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:49 IST2026-04-06T13:48:41+5:302026-04-06T13:49:12+5:30
Marriage Tradition : भारतात एक असं ठिकाण आहे जिथे परिवारातील सगळे भाऊ एकाच महिलेशी लग्न करतात. अजूनही ही परंपरा काही भागांमध्ये पाळली जाते. पाहुयात कुठे आहे ही प्रथा आणि कशी केली जाते.

भारतात 'इथे' सगळे भाऊ एकाच तरूणीशी करतात लग्न, कारण काय आणि कसा चालतो त्यांचा संसार?
Marriage Tradition : काही दिवसांआधी इंडोनेशियामधून एक बातमी समोर आली होती की, इथे एका महिलेने दोन खास मित्र असलेल्या पुरूषांसोबत एकत्रच लग्न केलं. यासाठी तिला घरातूनही पाठिंबा होता. महत्वाची बाब म्हणजे हे तिचं दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नातून तिला दोन मुलंही होती. आपण बघतो की, भारतात सामान्यपणे एक व्यक्ती एकाच व्यक्तीसोबत लग्न करतो. म्हणजे तशी आपल्याकडे प्रथा आहे. महाभारतातील द्रोपदीबाबतही आपल्याला माहिती असेल की, तिने सुद्धा पाच पांडवांसोबत लग्न केलं होतं. पण जर आपल्याला कुणी सांगितलं की, आजच्या काळातही असं होत असेल तर विश्वास बसणार नाही. भारतात एक असं ठिकाण आहे जिथे परिवारातील सगळे भाऊ एकाच महिलेशी लग्न करतात. अजूनही ही परंपरा काही भागांमध्ये पाळली जाते. पाहुयात कुठे आहे ही प्रथा आणि कशी केली जाते.
कुठे आहे लग्नाची ही अनोखी प्रथा?
काही महिन्यांआधी हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांनी एका तरूणीसोबत लग्न केलं होतं. हे लग्न वेगवेगळ्या रितीरिवाजांसोबत अनेक दिवस चाललं होतं. मोठ्या प्रमाणात लोक या लग्नाला आले होते. तरूण आणि तरूणीच्या सहमतीने हे लग्न पार पडलं होतं. येथील ग्रामीण भागात ही प्रथा जजदा नावाने ओळखली जाते.
काय असते ही परंपरा?
हिमाचलसोबतच ही प्रथा उत्तराखंडच्या काही भागांमध्येही बघायला मिळते. असं सांगण्यात येतं की, शेती आणि वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी रोखण्यासाठी अशाप्रकारची लग्ने प्रचलित झालीत. असं मानलं जातं की, अशा लग्नाने परिवार एकत्र राहतो आणि जमिनीची वाटणी होत नाही. त्याशिवाय सुरक्षा आणि कृषी कामे सुद्धा याचं एक कारण सांगितलं जातं. कुटुंबातील सगळेच सदस्य मुलांची जबाबदारी घेतात. तर परंपरेनुसार घरातील सगळ्यात मोठा भाऊ मुलांचा कायदेशीर पिता मानला जातो.
भारतीय कायद्यात बहुपती प्रथेचा कायदेशीर मान्यता नाही. पण हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये राजस्व रेकॉर्डमध्ये अशाप्रकारच्या लग्नांचा उल्लेख आढळतो. गावातील वृद्धांनुसार, अशी लग्ने समाजाच्या सहमतीने होतात. पण यांची संख्या फारच कमी आहे. अशी लग्ने जास्त समोर येत नाहीत.
कसा चालतो संसार?
लग्नानंतरची ही परंपरा अतिशय वेगळी आणि आश्चर्यकारक मानली जाते. एका कुटुंबात पाच भाऊ असतात आणि त्या सर्वांचा विवाह एका महिलेशी झालेला असतो. ही पद्धत काही दुर्गम आणि थंड प्रदेशांमध्ये आढळते, जिथे एकाच पत्नीशी अनेक भावांचा विवाह केला जातो. या परंपरेत एक खास नियम पाळला जातो. जर एखादा भाऊ आपल्या पत्नीसोबत असेल, तर तो खोलीच्या दरवाज्याबाहेर आपली टोपी ठेवतो. ही टोपी एक संकेत असतो. जोपर्यंत टोपी दरवाज्याजवळ ठेवलेली असते, तोपर्यंत इतर कोणताही भाऊ त्या खोलीत जात नाही. यामुळे भावांमध्ये शिस्त आणि परस्पर सन्मान राखला जातो. या समाजात महिलांना विशेष स्थान असतं. घरातील सर्व निर्णयांमध्ये महिलाच प्रमुख भूमिका बजावतात आणि त्या घराच्या प्रमुख मानल्या जातात.