भारतातील एकुलतं एक असं राज्य जिथे अजूनही धावत नाही रेल्वे, पाहा कोणतं आहे 'हे' राज्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:25 IST2026-01-20T14:24:53+5:302026-01-20T14:25:52+5:30
Interesting Facts : आपण कधी कल्पनाही केली नसेल की, देशात इतकं मोठं रेल्वे नेटवर्क असूनही एक असं राज्य आहे जिथे रेल्वे सेवा पोहोचलेली नाही. हे राज्य रेल्वे पोहोचत नसलेलं देशातील एकुलतं एक राज्य आहे.

भारतातील एकुलतं एक असं राज्य जिथे अजूनही धावत नाही रेल्वे, पाहा कोणतं आहे 'हे' राज्य...
Interesting Facts : भारतात जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. रोज कोट्यावधी लोक रेल्वेनं प्रवास करत आपल्या ठिकाणावर पोहोचतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहोचली आहे. देशभरात रेल्वेनं प्रवास करता येतो. महत्वाची बाब म्हणजे रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि स्वस्तही असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक हाच पर्याय निवडतात. हल्ली तर अनेक आधुनिक सुविधाही रेल्वे दिल्या जातात. नवीन रेल्वेंची सुरूवात देखील केली गेली आहे. भारतात रेल्वे लाइनची एकूण लांबी १ लाख १५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पण आपण कधी कल्पनाही केली नसेल की, देशात इतकं मोठं रेल्वे नेटवर्क असूनही एक असं राज्य आहे जिथे रेल्वे सेवा पोहोचलेली नाही. हे राज्य रेल्वे पोहोचत नसलेलं देशातील एकुलतं एक राज्य आहे.
भारतात किती रेल्वे स्टेशन?
अनेक राज्यातील गावा-खेड्यांमध्ये रेल्वे थांबते. अनेक छोटे छोटे रेल्वे स्टेशन नेहमीच चर्चेत असतात. देशात एकूण ७ हजार ३०० पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. भारतात रोज १३ हजार ते १४ हजार प्रवासी रेल्वे आणि ९ हजार मालगाड्या धावतात. म्हणजे एकूण रोज २० हजारांच्या आसपास रेल्वे धावतात. ज्या ७ हजार ३०० स्टेशन कव्हर करतात. इतकंच नाही तर भारतात रोज साधारण २.४ कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. इतका मोठा आवाका असूनही देशात एक असं राज्य आहे, जिथे अजिबात रेल्वे पोहोचलेली नाही.
कोणत्या राज्यात धावत नाही रेल्वे?
देशातील सिक्कीम हे एक असं राज्य आहे जिथे रेल्वे धावत नाही आणि ना इथे कोणती रेल्वे लाइन आहे. हे देशातील एकुलतं एक असं राज्य आहे, जिथे रेल्वे नेटवर्क आजपर्यंत पोहोचलेलं नाही. पण सिक्कीम रेल्वे लाइनचं काम जोरात सुरू आहे. सिवोक–रांगपो रेल्वे प्रकल्प हा येथील मुख्य प्रकल्प आहे. ज्यामुळे सिक्कीम प्रथमच भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. हा प्रकल्प जवळपास ४४.९६ किमी लांब आहे.
हा रेल प्रकल्प आता अधिक आव्हानात्मक भूप्रदेशातून बनवला जात आहे. अनेक भुयारं, पुलं आणि इंजिनिअरिंग कार्य आवश्यक आहे. या प्रकल्पाचं उद्दिष्ट सिक्कीममधील रांगपो ला प्रथम रेल्वे स्टेशन बनवण्याचं आहे. सध्याच्या माहितीनुसार, प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षित वेळ २०२७ पर्यंत आहे, आणि त्यानंतरच सिक्कीममध्ये रेल्वे सेवा वास्तवात सुरू होईल अशी शक्यता आहे.