लक्झरी कार, मोठा फ्लॅट अन् चांगला व्यवसाय; इतके असूनही जत्रेत विकतात १० रूपयांचे पान, कारण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:59 IST2026-03-02T13:58:32+5:302026-03-02T13:59:16+5:30
राजू उत्तर प्रदेशातील महोबा येथे राहतात. परंतु मध्य प्रदेशातील छत्तरपूर इथल्या जत्रेत ते पान टपरी लावण्यासाठी येतात.

लक्झरी कार, मोठा फ्लॅट अन् चांगला व्यवसाय; इतके असूनही जत्रेत विकतात १० रूपयांचे पान, कारण..
लक्झरी कार, चांगला व्यवसाय अन् मोठा फ्लॅट...इतके असूनही एक व्यक्ती आजही पान टपरी सोडत नाही. महोबा येथे राहणारे राजू चौरसिया गेल्या ३६ वर्षापासून पान बनवत आहेत. लाखो संपत्ती असूनही राजू छोट्या छोट्या जत्रेत स्वत: बसून १० रूपयाचा पान विकतात.
वयाच्या १५ व्या वर्षापासून राजू चौरसिया यांनी पान बनवणे सुरू केले. १९८९ पासून ते पान टपरी चालवतात. त्या काळी एक पान ५० पैशांना विकले जायचे. राजू चौरसिया सांगतात की, ज्या व्यवसायाने मला आज इतके मोठे केले, माझे घर चालवले ते मी कसे सोडू? असं ते विचारतात. आज त्यांच्याकडे घर, कार सर्व काही आहे. मुलेही आपापल्या व्यवसायात गुंतली आहेत. परंतु राजू आजही जत्रेत पानाचे दुकान लावतात. राजू उत्तर प्रदेशातील महोबा येथे राहतात. परंतु मध्य प्रदेशातील छत्तरपूर इथल्या जत्रेत ते पान टपरी लावण्यासाठी येतात.
राजू चौरसियांचे यांचे पानाचे दुकान चांगलेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांची पान टपरी लागल्याचे कळताच लोकही मित्रांसह पान खायला जमतात. ३६ वर्षाच्या या काळात राजू चौरसियांनी ग्राहकांशी घरच्यांसारखे नाते बनवले. राजू यांच्या पानाची चव वेगळीच आहे. त्यांच्या पानात नारळाचा किस, बडीशेप, सुपारी, करोंदा मीठ मसाला, गुलकंद, गुलाबाच्या पाकळ्या आणि एक खास "गोपाळ चटणी" घातली जाते. देसी पान आणि बंगाली पान दोन्ही १० रुपयांना विकले जाते. देसी पान थोडे मोठे असते पण त्याची चव जीभेवर रेंगाळते.
दरम्यान, आज राजू चौरसिया धार्मिक साहित्याचा घाऊकाची विक्रीही करतात. त्यांचा मुलगा सिमेंट आणि लोखंडी सळ्यांचा व्यवसाय करतो. शहरात त्यांचे घर आहे आणि एक महागडी कार आहे, परंतु पानाशी असलेले त्यांचे नाते आजही कायम आहे. पान विकणे आता गरजेचे नाही परंतु मनाचा आनंद म्हणून ते आजही हे काम करतात.