ना तिकीट, ना कुठले रिझर्वेशन..; 1948 पासून भारतीयांना मोफत प्रवास देतेय ही ट्रेन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:48 IST2026-01-13T16:47:46+5:302026-01-13T16:48:29+5:30
भारताची एकमेव ‘मोफत’ ट्रेन; निसर्गाच्या कुशीतून करा जादुई प्रवास...

ना तिकीट, ना कुठले रिझर्वेशन..; 1948 पासून भारतीयांना मोफत प्रवास देतेय ही ट्रेन...
रेल्वे भारताची जीवनवाहिनी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचा विस्तार झालेला आहे. दररोज लाखो भारतीय याच रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने कुठेही प्रवास करण्यासाठी तिकीट अनिवार्य आहे. मात्र, देशात अशी एक रेल्वे आहे, ज्यातून प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीट घेण्याची गरज नाही. तुम्ही विना तिकीट या रेल्वेतून प्रवास करू शकता. विशेष म्हणजे, ही रेल्वे गेल्या 75 वर्षांपासून तिकीटविना मोफत प्रवास देत आहे.
कुठे धावते ही रेल्वे?
हा जादुई प्रवास पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवरील भाकरा-नांगल असा आहे. या ट्रेनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला स्टेशनवर लांब रांगेत उभे राहावे लागत नाही किंवा महिनोनमहिने आधीच आरक्षण करण्याची गरज नाही. फक्त ट्रेनमध्ये चढा आणि निसर्गाच्या कुशीत प्रवास करा. महत्वाचे म्हणजे, 1948 पासून आजपर्यंत...ही ट्रेन तिकीटाविना प्रवाशांना घेऊन जाते. स्थानिक नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक या सेवेचा नियमितपणे लाभ घेतात.
एका वेगळ्याच जगाचा अनुभव...
या रेल्वे सेवेचे संचालन भाखरा ब्यास मॅनेजमेंट बोर्ड (BBMB) करत आहे. सुरुवातीच्या काळात ही ट्रेन वाफेच्या इंजिनांवर चालत होती. 1953 मध्ये अमेरिकेतून आणलेल्या डिझेल इंजिनांचा वापर सुरू करण्यात आला. आजही ही ट्रेन त्याच इंजिन प्रणालीवर चालते. दररोज सुमारे 50 लिटर डिझेलचा वापर होत असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. नांगलहून निघालेली ट्रेन उंच शिवालिक टेकड्यांमधून पुढे जात असताना, प्रवाशांना सतलज नदीचे निळेशार पाणी अन् खिडक्यांमधून वाहणारी थंड वारा प्रवाशांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाते.
तिकीट लागू करण्याचा प्रस्ताव फेटाळला
BBMB कडून वेळोवेळी या ट्रेनसाठी तिकीट प्रणाली लागू करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, ही सेवा वारसा आणि सार्वजनिक सुविधा म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेत, ती मोफतच सुरू ठेवण्यात आली. या निर्णयामुळे ही ट्रेन देशातील एकमेव अधिकृत तिकीटविरहित रेल्वे सेवा म्हणून ओळखली जाते.
स्थानिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा
ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या नियमित नेटवर्कचा भाग नसली तरी नांगल-भाखरा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची दळणवळण सेवा आहे. दररोज शेकडो प्रवासी या सेवेचा वापर करतात.