महेश घोराळे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील चार हजार लोकसंख्येचे पिपलांत्री गाव, कधी काळचा दुष्काळ आणि प्रदूषणामुळे येथील लोक गाव सोडून जात असत. पण, २० वर्षांपूर्वी एक व्यक्ती परिवर्तनाच्या दृढनिश्चयाने सरपंच होऊन पुढे येतो. मुलीच्या स्मरणार्थ एक झाड लावून ही हिरवी वाट धरतो. याच वाटेवर आज प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर गावात १११ देशी वृक्षांची लागवड होते. महाराष्ट्रातील पाणीदार गावांकडून प्रेरणा घेऊन या गावाने ४ लाखांहून अधिक झाडे जगवली व ओसाड जमिनीवर हिरवे स्वप्न फुलविले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिपलांत्रीचे माजी सरपंच, तथा समाजसेवक पद्मश्री डॉ. श्याम सुंदर पालिवाल यांनी लोकमतला सांगितले की, परिसरातील खाणींमुळे पर्यावरणाच्या विविध समस्यांनी घेरलेल्या गावात मी सरपंच म्हणून निवडून आलो. २००५ पासून ओसाड गावचा हिरव्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. खाणींवर नियंत्रण, जलसंधारण मोहीम, वृक्षलागवड आदी कामे हाती घेऊन श्रमदानातून ती पूर्ण केली.
लेकीच्या स्मरणात पहिलं रोप
२००७ मध्ये पालीवाल यांच्या मुलीचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. त्यांनी कुरणात मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक रोप लावले. या भावनिक प्रसंगात अश्रू दाटलेले गाव एकत्र झाले. या एका रोपासाठी गावाच्या भावना जागृत होऊ शकतात, तर या विधायक कामासाठी गावकऱ्यांना एकत्र आणता येईल, या विचारातून त्यांनी मोहीम हाती घेतली.
महाराष्ट्रातून प्रेरणा
डॉ. पालिवाल यांनी सरपंच झाल्यानंतर महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गावांना भेटी देऊन येथून गावाच्या विकासाची प्रेरणा घेतली. या गावांतील स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक विकासाची बिजे त्यांनी आपल्या पिपलांत्री गावामध्ये रोवली. भोवतालच्या परिसरात गावकऱ्यांनी श्रमदानातून कडुलिंब, शिसम, आंबा, वड, पिंपळासारखी विविध प्रजातींची लाखो झाडे जगविली. त्यामुळे शुष्क क्षेत्रात वसलेले हे गाव आज हिरवेगार झाल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवत आहे.
२० वर्षांपूर्वी खाणींमुळे मलब्याचे पहाड, प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास व्हायचा. टँकर, रेल्वेने गावात यायचे पाणी. खोलं भूजल, कोरडी शिवारं अन् हवालदिल शेतकरी अशी स्थिती होती. जैवविविधतेचा ऱ्हास, बेरोजगारी, स्थलांतर व्हायचे. आता स्वच्छतेत गाव आदर्श. जलसंधारणामुळे भूजल वाढले. स्त्री सन्मान, सेंद्रिय शेती, वृक्षारोपणामुळे समृद्धी. गावावर शेकडो लघुपट, सिनेमे येथे तयार होतात. देशविदेशातून भेटीसाठी लोक येतात.
दरवर्षी झाडांचा उत्सव
गावात १११ झाडे लावण्याची प्रथा निरंतर सुरूच असून, प्रत्येक रक्षाबंधनाला येथे पर्यावरणाचा अनोखा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. गावातील मुली आपल्या भावंडांप्रमाणे वाढविलेल्या झाडांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतात. पालकही लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे आणि मुलींना शिक्षण देण्याचे वचन देतात.
गावात जलसंरक्षण, वृक्षारोपण, शिक्षण, आत्मनिर्भरता, स्वच्छता, आदी विविध क्षेत्रांत आम्ही काम केले. लाखोंच्या संख्येने परिसरात झाडे वाढविली आहेत. येथून प्रेरणा येऊन विविध देशांतील लोक आपापल्या गावात काम करीत आहेत.-डॉ. श्याम सुंदर पालिवाल, माजी सरपंच, पिपलांत्री