विनापैसे देशभर फिरल्याचा या विद्यार्थ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 02:51 PM2017-11-06T14:51:27+5:302017-11-06T14:58:33+5:30

या अवलियाने भारत देशातल्या ११ राज्यात फुकटात प्रवास केल्याचा दावा केलाय.

Engineer drop out Student travelled India without using Money | विनापैसे देशभर फिरल्याचा या विद्यार्थ्याचा दावा

विनापैसे देशभर फिरल्याचा या विद्यार्थ्याचा दावा

Next
ठळक मुद्देआपल्याला साधं नाक्यावर जायचं असेल तरी खिशातले १० रुपये खर्च होतात.मग हा अवलिया फुकटात कसं काय ११ राज्य फिरला असेल बरं?या प्रवासादरम्यान त्याला सोशल मीडियानेही बरीच मदत केली आहे.

अनंतपुर : गेल्या काही वर्षात ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझमला फार महत्व आलं आहे. मोठं-मोठे पॅकेज दाखवून आपल्याला देशभर, जगभर फिरवण्याची आमिषं दाखवली जातात. यातूनच कितीतर ट्रॅव्हलर ब्लॉगरही तयार झाले आहेत. त्यांना फिरण्यासाठीच पैसे दिले जातात. पण तुम्हाला कोणी सांगितलं की एक रुपयाही खर्च न करता देश फिरता येतो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना?  

या एका अवलियाचं म्हणणं आहे की त्याने एक रुपयाही खर्च न करता देश पिंजून काढलाय. आश्चर्य वाटलं ना? त्याने हा फुकटाचा प्रवास कसा मॅनेज केलाय याविषयी आपण जाणून घेऊया. 

विमल गिथानंदन असं या जिप्सीचं नाव आहे. अनंतपूर येथील जेएनटीयूमधून इंजिनिअरचा ड्रॉप आऊट असलेला विमल म्हणतो की, ‘इंजिनिअरींग करताना मला फार एकटं एकटं वाटायला लागलं. आजूबाजूला माणसं असली तरी माझा एकटेपणा दूर होत नव्हता. तेव्हा मी जोरजोरात रडत असे. म्हणून या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी भटकंती करायची ठरवी. प्रवासात आपण कोण आहोत कसे आहोत याची आपल्यालाच नव्याने ओळख पटते. म्हणून मी एकट्यानेच प्रवास करायचं ठरवलं.’

आतापर्यंत त्याने ११ राज्यात फेरफटका मारलाय. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, आसाम, मेघालय, नागालँड आणि वेस्ट बेंगाल अशा ठिकाणी त्याने एकही रुपया खर्च न करता प्रवास केल्याचं तो सांगतो. सगळ्यात प्रथम अनंतपूर ते बेंगलोर असा प्रवास केला. त्यावेळी त्याने संपूर्ण दक्षिण भारत पिंजून काढला. मग त्याने महाराष्ट्र, आसाम, मेघालय, नागालँड असा प्रवास केला. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला साधं नाक्यावर जायचं असेल तरी खिशातले १० रुपये खर्च होतात मग हा अवलिया फुकटात कसं काय ११ राज्य फिरेल? त्यावर त्याने असा दावा केलाय की, प्रवासासाठी त्याने इतरांकडून मदत मागितली. कार, ट्रक, बाईकवर त्याने लिफ्ट घेतली. प्रत्येकवेळी त्या चालकांसोबत त्याने सेल्फीही काढला. त्यांची संपूर्ण माहितीही घेतली. जेणेकरून त्यांच्या संपर्कात राहता येईल. असाच एक प्रसंग सांगताना तो म्हणाला की, ‘रमझानच्या काळात अनंतपूर ते बेंगळुरू असा प्रवास करत असताना एक ट्रकचालक भेटला. तो ट्रकचालक पत्रकारही होता. त्याच्या प्रवासादरम्यान एखादा अपघात घडला की तो चालक वर्तमानपत्रात बातम्या देत असत. मला माझ्या इच्छुक स्थळी त्याने मला सोडलंच शिवाय मला खायलाही दिलं. मी उपाशी आहे समजल्यावर त्याने स्वत: हॉटेलमधून जेवण मागवलं. माझं सुदैव असं की मला प्रत्येकवेळी अशीच माणसं भेटत गेली. ’

‘या सगळ्या प्रवासात मी सर्व वाहतूक व्यवस्थेचा वापर केला आहे. ट्रेन, बस यांचाही वापर केला. पण माझ्या सहप्रवाशांनी मला मदत केली त्यामुळे मी मला वाटेल तेवढा प्रवास करू शकलो,’ असंही तो पुढे म्हणाला. 

या प्रवासादरम्यान त्याला सोशल मीडियानेही बरीच मदत केली आहे. तो ज्याठिकाणी असायचा त्या ठिकाणचं लोकेशन तो सोशल मीडियावर शेअर करायचा. त्यानुसार अनेकांनी त्याला मदत केली आहे. केरळमधील प्रवासही त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरला. तेथे गेल्यावर त्याला पुन्हा माणुसकी असल्याचं जिवंत उदाहरण सापडलं.  कारण एका गरीब कुटुंबाने त्याला  फार मदत केली. त्याला जेवण आणि राहण्यासाठी तर जागा दिलीच पण झोपण्यासाठी त्यांनी त्यांची चादर देऊन स्वत: मात्र जमिनीवर झोपले. ते कुटूंब गरीब होतं, त्यांच्याकडे फार सामान नव्हतं. पण विमल एक पर्यटक असल्याने त्याची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी स्वत: जमिनीवर झोपून विमलला त्यांची चादर देऊ केली. 

या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली आहे त्यांच्यासाठी तो ‘गिव्हिंग बॅक’ नावाचा उपक्रम राबवणार आहे. प्रवासादरम्यान मदत करणाऱ्या प्रत्येकाला तो आपल्या घरी बोलावून त्यांचं आदरतिथ्य करण्याचा त्याचा मानस आहे. या लोकांमुळे त्याला माणसांमध्ये माणुसकी आहे याचा प्रत्यय आला असंही तो म्हणतो. 

तो म्हणतो की, ‘मी माझ्या भविष्याचा,करिअरचा केव्हाच विचार करत नाही. आयुष्य आहे तसं जगत गेल्याने प्रत्येक क्षण जगता येतो. भविष्याचा विचार करण्याच्या नादात आपण आजचा क्षण हरवून बसतो. आता त्याला एक सामाजिक संस्था काढायची आहे. ही संस्था शरीरविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी असेल. एका रेड-लाईट विभागात तो फिरत असताना त्याला वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांविषयी फार दया आली. त्यांना ज्यापद्धतीने या क्षेत्रात ओढलं जातं, त्यांच्यावर ज्याप्रकारे अन्याय होतात त्यावर वाचा फोडण्यासाठी ही संस्था काम करेल असं तो म्हणतो. 

सौजन्य - thenewsminute.com

Web Title: Engineer drop out Student travelled India without using Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.