Border 2 : काय आहे बॉर्डर सिनेमात दाखवलेल्या मंदिराचा इतिहास, कुणी उभारलं होतं हे मंदिर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:53 IST2026-01-29T14:52:37+5:302026-01-29T14:53:29+5:30
Border 2 Temple : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील भारत - पाक सीमेवर असलेलं हे मंदिर केवळ धार्मिक आस्थेसाठी नाही तर याचा संबंध भारतीय सैन्याच्या इतिहासासोबत देखील आहे.

Border 2 : काय आहे बॉर्डर सिनेमात दाखवलेल्या मंदिराचा इतिहास, कुणी उभारलं होतं हे मंदिर?
Border Movie Temple : बॉर्डर 2 सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सोबतच लोकांमध्ये सिनेमातील काही खरी ठिकाणं आणि कहाण्यांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील वाढली आहे. सिनेमातील एक ठिकाण सध्या चांगलंच चर्चेत आहे. ते म्हणजे सिनेमातील तनोट माता मंदिर (Tanot Mata Temple). हे मंदिर बॉर्डर सिनेमात दाखवण्यात आलं होतं. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील भारत - पाक सीमेवर असलेलं हे मंदिर केवळ धार्मिक आस्थेसाठी नाही तर याचा संबंध भारतीय सैन्यासोबत देखील आहे.
कुणी बांधलं हे मंदिर
काही ऐतिहासिक पुरावे आणि स्थानिक परंपरांनुसार, तनोट माता मंदिर भाटी राजपूत राजा तनु राव यांनी बांधलं होतं. त्यांनी इ.स. ८२८ मध्ये या मंदिराची स्थापना केली आणि तनोट देवीची मूर्ती स्थापित केली. या देवीला हिंगलाज मातेचा अवतार मानलं जातं. हे मूळ रूपाने आजच्या बलूचिस्तानमध्ये स्थित शक्तिपीठांपैकी एक आहे. तनोट हे केवळ एक धार्मिक केंद्र नाही तर बऱ्याच काळापासून भाटी राजपूतांसाठी एक मोठं राजधानी क्षेत्र राहिलं आहे.
मंदिराला चमत्कारी का मानलं जातं
हे मंदिर १९६५ आणि १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान देशभरात प्रसिद्ध झालं होतं. या यु्द्धादरम्यान पाक सैन्यांनी मंदिरात आणि आजूबाजूला जवळपास ३०० बॉम्ब टाकले होते. आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराच्या परिसराच्या आत एकाही बॉम्बचा स्फोट झाला नाही आणि मंदिर सुरक्षित राहिलं. आजही या मंदिराच्या परिसरात असलेल्या संग्रहालयात जवळपास साडे चारशे स्फोट न झालेले बॉम्ब ठेवलेले आहेत.
लोंगेवाला यु्द्धाशी संबंध
१९७१ मध्ये लोंगेवालाच्या युद्धादरम्यान भारतीय सैन्याच्या एका छोट्या बटालियनने एका मोठ्या पाकिस्तानी ब्रिगेडचा सामना केला होता. सैनिकांनी नंतर सांगितलं होतं की, तनोट मातेमधील त्यांच्या विश्वासाने या युद्धात त्यांचं मनोबल खूप वाढलं होतं.
सीमा सुरक्षा दलाची भूमिका
१९७१ च्या युद्धानंतर सीमा सुरक्षा दल मंदिराची पूर्ण व्यवस्था बघतात. रोज सकाळी आणि सायंकाळची पूजा बीएसएफचे जवान वर्दीमध्ये करतात. अशाप्रकारे तनोट माता मंदिर भारतातील अशा मंदिरांपैकी एक झालं जिथे सैनिक पुजाऱ्याचं काम करतात. १९७१ च्या युद्धात विजय मिळाल्याच्या आठवणीत मंदिर परिसरात एक विजयस्तंभ देखील उभारला आहे. दरवर्षी १६ डिसेंबरला इथे विजय दिवस साजरा करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.