शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी विमा कंपनीतील दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 23:37 IST2021-06-14T23:36:50+5:302021-06-14T23:37:09+5:30
शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना बजाज अलियांज या खासगी विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी रंगेहाथ पकडून दिले.

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना खासगी विमा कंपनीतील दोन जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना बजाज अलियांज या खासगी विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी रंगेहाथ पकडून दिले. ही घटना कर्की ता. मुक्ताईनगर येथे सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
जितेंद्र सुभाष महाजन (२१) व जितेंद्र सुभाष वानखेडे (२५, दोघे रा. रावेर) अशी या अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तहसिलदार श्वेता संचेती , पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार,तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी तसेच विमा कंपनीचे जळगावचे समन्वयक मच्छिंद्र खरात यांनी वेष बदलून या कारवाईत सहभाग घेतला.
मुक्ताईनगर तालुक्यात १५ दिवसापूर्वी आलेल्या वादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यात शेतीतील नुकसान जास्त दाखवून जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हे दोघे जण शेतकऱ्यांकडून एकराप्रमाणे पैसे घेत होते. याबाबत प्रवीण विठ्ठल महाजन यांनी आमदार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर ही कारवाई करण्यात आली.
कंपनीने प्रतिनिधींना एकरी दोन हजार रुपये घेण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- मच्छिंद्र खरात, जिल्हा समन्वयक, बजाज अलियांज.
कर्की शेती शिवारातील तब्बल १४० शेतकऱ्यांची यादी विमा प्रतिनिधींकडे असून एकरी दोन हजार रुपये प्रमाणे विमा हवा असेल तर मागणी केली जात आहे.
-प्रवीण महाजन, शेतकरी, कर्की.