‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 18:10 IST2023-10-05T18:10:32+5:302023-10-05T18:10:43+5:30

पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे.

the ceremony of love marriages has gone away Only two completed marriage in Pitrupaksha | ‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’

‘लव्ह बर्डस्‌’च्या डोक्यावर ‘कावळा’, प्रेमविवाहांचा दूर लोटला सोहळा! पितृपक्षात अवघ्या दोघांनीच उरकले ‘शुभमंगल’

 कुंदन पाटील 

 जळगाव : पितृपक्षात शुभकार्य करु नये, हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे. या गैरसमजापासून प्रेमवीरही दूर नाहीत. म्हणूनच पितृपक्षात प्रेमविवाह करणाऱ्यांची संख्या अचानक घसरली आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयातील अक्षदांचा रंगही आता फिका पडायला लागला आहे. यावर्षी पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. १४ ऑक्टोबरला पितृपक्ष संपेल. पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालण्यासाठी प्राधान्य दिले जाते.श्राद्ध पक्ष १५ दिवसांचा असतो. श्राद्ध पक्ष भाद्र शुक्ल पौर्णिमेपासून अश्विन कृष्ण अमावस्यापर्यंत होतो. या १५ दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, असा समज समाजमनात असतो. पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी केल्यास किंवा शुभकार्य उरकल्यास पितरांची नाराजी ओढावली जाते, असा दावाही काही जण करतात. पितृ पक्षाच्या काळात खरेदी केलेल्या वस्तू पितरांना समर्पित मानल्या जातात. हाच धागा प्रेमवीरांच्या मनालाही शिवला आहे.

विवाहनोंदणी ओसरली
यंदाच्या वर्षभरात सप्टेंबर महिन्यांपर्यंत २०६ विवाहांची नोंदणी झाली.त्यात सर्वाधिक प्रेमविवाहांचा समावेश आहे. मात्र पितृपक्ष लागल्याने अनेकांनी प्रेमविवाहांच्या नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगावच्या दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील वऱ्हाडींनी शासकीय ‘वरमाला’ गुंडाळून ठेवल्या आहेत.

५१ हजारांची ‘दक्षिणा’
दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील विवाहनोंदणीपोटी यंदा ५१ हजार ९९५ रुपयांची फी वसुल करण्यात आली आहे. पितृपक्षात भरण्याची रक्कम आटल्याने शासकीय तिजोरीतील ‘दक्षिणा’चा कप्पाही सध्या रिकामाच आहे.

गेल्या ९ महिन्यातील विवाहनोंदणी
महिना-विवाह नोंदणी
जानेवारी-४७
फेब्रुवारी-४०
मार्च-२९
एप्रिल-२६
मे-२९
जून-११
जुलै-०१
ऑगस्ट-००
सप्टेंबर २३
कोट

सध्या विवाहनोंदणीपूर्वीची प्रक्रिया व विवाहबद्ध होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अनेक जण पितृपक्षानंतर विवाहबद्ध होऊ, असे सांगताना दिसतात. -संजय ठाकरे, दुय्यम उपनिबंधक, जळगाव.

Web Title: the ceremony of love marriages has gone away Only two completed marriage in Pitrupaksha