अप-डाऊन करणार्यांसाठी रेल्वे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 19:21 IST2020-11-12T19:20:45+5:302020-11-12T19:21:06+5:30
मुंबईतील लोकलसेवेच्या धर्तीवर निर्णय घ्या; रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत कासार यांची मागणी

अप-डाऊन करणार्यांसाठी रेल्वे सुरू करा
जळगाव । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून अप-डाऊन करणार्या प्रवाशांसाठी बंद झालेली रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, त्यासाठी मुंबईतील लोकलसेवेच्या धर्तीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ सल्लागार समितीचे सदस्य चंद्रकांत (संदीप) कासार यांनी भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधक यांच्याकडे केली आहे.
देशात लॉकडाऊन लागू होईपर्यंत अप-डाऊन करणारे प्रवासी हे मोठ्या संख्येने रेल्वेवर अवलंबून होते. अप लाईनवरील पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, पाळधी, धरणगाव, अमळनेर, नंदूरबार तर डाऊन लाईनवरील भुसावळ, खंडवा, इटारसी, तसेच मलकापूर, शेगाव, अमरावती या रेल्वे स्थानकांपर्यंत प्रवाशांची दैनंदिन ये-जा होती. परंतु, लॉकडाऊन झाल्यानंतर या सर्वांना रेल्वेला पर्यायी व्यवस्था म्हणून स्वतःच्या दुचाकीने प्रवास करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत वेळखाऊ, शारीरिक व मानसिक दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. शिवाय या प्रवासातून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत असल्याकडे रेल्वे प्रवाशांच्या संघटनेनेही लक्ष वेधले आहे.
रेल्वे सुरू करून दिवाळी भेट द्या
मुंबईमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला व इतर वर्गासाठी टप्प्याटप्प्याने लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर भुसावळ मंडळात रेल्वेने अप-डाऊन करणार्या प्रवाशांसाठी तातडीने रेल्वे सेवा सुरू करून दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी चंद्रकांत (संदीप) कासार यांनी केली आहे.