शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का? अन् शेवटी त्यांच्या पदरी पडणार केवळ ६,९५० रुपये !
By अजय पाटील | Updated: June 2, 2025 11:30 IST2025-06-02T11:29:59+5:302025-06-02T11:30:59+5:30
पाहा, गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...

शेतकऱ्याने फक्त वर्षभर राबायचेच का? अन् शेवटी त्यांच्या पदरी पडणार केवळ ६,९५० रुपये !
अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात वाढ करून तो ८ हजार ११० प्रति क्विंटल केला आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव पाहता, वाढीव हमीभाव केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
गेल्या हंगामात शासनाकडून ७ हजार ५०० रुपयांचा हमीभाव असताना, सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला, तर खासगी जिनिंगमध्ये ६,५०० ते ६,८०० रुपये क्विंटल एवढ्या दराने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करावा लागला. त्यात सीसीआयच्या केंद्रावर अनेक अटी-शर्थींमुळेही शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले होते.
गेल्या ६ हंगामातील हमीभावाची स्थिती...
- २०२०-२१ ५,८२५
- २०२१-२२ ५,७२६
- २०२२-२३ ६, ३८०
- २०२३-२४ ७,०२०
- २०२४-२५ ७,५२१
- २०२५-२६ ८,११०
असे आहे गणित
- एकरी खर्च- ३३,६००
- एकरी कापूस उतारा- ५ क्विंटल
- यंदाचा हमीभाव- ८,११० रुपये क्विंटल
- हमीभावाप्रमाणे भाव मिळाल्यास ४०,५५० रुपये
- लागवड खर्च काढून होणारा फायदा ६,९५० हजार
शेतमाल किमती घसरण्याचा धोका
रूपेश उत्तरवार, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १० टक्केने कमी केले. यामुळे खुल्या बाजारात तेलबियाण्याच्या शेतमालाच्या किमती घसरण्याचा धोका आहे. यामुळे कृषी अर्थव्यवस्था मोडणार आहे. खर्चावर आधारित दर शेतमालाला मिळणार नाही. सोयाबीनचे लागवड क्षेत्र यामुळे घटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
खरीप हंगाम तोंडावर आहे. याचवेळी केंद्र शासनाने कच्च्या तेलावरील आयात शुल्क १६.५० टक्के केले आहे. पूर्वी कच्च्या तेलावरील खाद्य शुल्क २६.५० टक्के होते. यामध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे पामतेलाच्या किमती ९ रुपये प्रतिकिलोने कमी झाल्या आहेत. तर सोयाबीन तेलाच्या किमती १० रुपये प्रतिकिलोने घसरल्या आहे. तर सूर्यफूल तेलाच्या किमती किलोमागे ११. ५० पैशाने कमी झाल्या आहेत. यामुळे पुढील काळात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याने शेतमाल खरेदी करताना साेयाबीन प्लॉन्टचे दर क्विंटलमागे १०० रुपयाने कमी झाले.