शिरसोली परिसरातील शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 09:23 PM2019-11-07T21:23:30+5:302019-11-07T21:24:08+5:30
शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने त्वरीत मदत करण्याची मागणी
शालिग्राम पवार ।
शिरसोली ता.जळगाव : परीसरात अतिवृष्टी झाल्याने तोंडाशी आलेल्या ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हाती आलेल्या पिकांना कोंब येऊन चाराही सडला आहे. या परीस्थीती ने बाप भिक मागु देईना आई जेवु घालेना अशी स्थीती झाल्याने शेतकरी पुर्णपणे खचला असुन त्याला शासनाने नव्याने ऊभारी देण्यासाठी सरकारने त्वरीत मदत करण्याची मागणी केली आहे.
परीसरात मागील वर्षी कोरडा दुष्काळ व यंदा अतिवृष्टी यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असून मागचे कर्ज फीटत नाही तो पर्यंत नव्याने कर्जाचा डोंगर ऊभा राहीला आहे.
यंदा पावसाळा सुरवाती पासुनच चांगला असल्याने पीक ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी व फुले ही पिके चांगल्या पैकी बहरली होती.
यंदा आपले दारीद्र्य दूर होणार अशी अशा असताना ऐन पीक काढणीला आली असताना सलग पंधरा दिवस पाऊस सुरु राहील्याने कापणीला आलेल्या पिकांना कोंब फुटुन चाराही पुर्ण पणे सडला आहे. या नुकसानामुळे शेतकरी पुरता खचला आहे. मुली बाळींचे शिक्षण, घेतलेले पीक कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी सापडला असुन त्याला शासनाने सरसकट कर्ज माफी करुन झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.